शासनाने फटाक्यांच्या विक्रीसाठी कडक नियम केले असले, तरीही महाड शहरात हे नियम सर्रासपणे पायदळी तुडवत फटाक्यांची विक्री केली जात आहे. तर महसूल विभाग व महाड नगरपालिका मात्र या विक्रेत्यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
फटाक्यांच्या दुकानांसाठी आवश्यक सुरक्षेचे उपायही केले गेलेले नाहीत. फटाक्यांच्या दुकानाबाबत अग्निशमन दलाच्या काही सूचना आहेत. मात्र, रस्तेकडेच्या दुकानांकडून त्याचे निकष पाळले गेलेले नाहीत.
मुख्य रस्ता, गर्दीची ठिकाणे अशा जागी फटाक्यांची विक्री न करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. मात्र महाडच्या शिवाजी चौकात उलट परिस्थिती असून येथे अनेकांनी मुख्य रस्त्यालगतच फटाक्यांची दुकाने थाटली आहेत.
त्याकडे प्रशासन करत असलेल्या दुर्लक्षामुळे महाड शहरात ‘स्फोटक’ परिस्थिती निर्माण झाली असून या दुकानांमध्ये एखादा अपघात झाला, तर नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न आहे. या फटाक्यांच्या दुकानामुळे जवळपासच्या परिसरालाही धोका आहे.
परवानग्या देताना सुरक्षेचा विचारच नाही!
या भागात एकाच परवान्यावर दोन दुकाने, परवाना नसतानाही फटाका विक्री, सुरक्षेबाबत दुर्लक्ष, एकाच वीज मीटरवर दोन ते तीन दुकानांना पुरवठा, फटका दुकानांमागे लोहार काम, नेहमीच होणारी वाहतूक कोंडी या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करून पालिकेने फटाका दुकानांना परवानगी दिली आहे. फटाक्यांची विक्री मोकळय़ा जागेत करण्याचा नियम असून याच शिवाजी चौक भागात पालिकेची मोकळी जागाही आहे. मात्र तेथे ही दुकाने न थाटता रस्त्यालगत थाटण्यात आली आहेत.