रेल्वेचे आरक्षित झालेले तिकीट आता यापुढे रद्द करण्यासाठी पूर्वीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे; तसेच रेल्वे रवाना होण्याच्या चार तास आधी तिकीट रद्द केल्यास कोणताही परतावा मिळणार नाही, असे भारतीय रेल्वे विभागाकडून कळवण्यात आले आहे.
गरजू प्रवाशांना तिकीटे मिळण्याच्या उद्दिष्टाने परताव्याच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 12 नोव्हेंबरपासून नवे दर लागू होतील. नव्या नियमांनुसार, रेल्वे सुरू होण्याच्या 48 तास आधी तिकीट रद्द करावयाचे असल्यास, फर्स्ट एसी व एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी 240 रुपये, सेकंड एसी व फर्स्ट क्लाससाठी 200 रु., थर्ड एसीसाठी 180 रु., स्लीपरसाठी 120 रुपये व सेकंड क्लाससाठी 60 रुपये शुल्क कापण्यात येणार आहे.
सेकंड क्लास श्रेणीतील आरक्षित, प्रतिक्षा यादितील, रिझर्व्ह अगेन्स्ट कॅन्सलेशन (आरएसी) तिकीटे रद्द करण्यासाठी 30 रूपयांच्याऐवजी 60 रूपयांचा क्लार्क चार्ज भरावा लागणार आहे. आरएसी, वेटलिस्टींग तिकीटे रेल्वे रवाना झाल्यानंतर केवळ अर्ध्या तासांपर्यंतच रद्द करता येणार आहे. यापुर्वी रेल्वे सुटल्यानंतर दोन तासांपर्यंत ही तिकीटे रद्द करता येत होते. आता रेल्वे रवाना होण्याच्या 48 तास ते 12 तासांदरम्यान एकूण रकमेच्या 25 टक्के शुल्क तिकीट रद्द करण्यासाठी भरावे लागणार आहे. यापूर्वी 48 तास ते 6 तासांच्या दरम्यानपर्यंत ही सवलत होती. तसेच रेल्वे सुटायच्या 6 तास आधीपासून रेल्वे सुटल्यानंतर दोन तासापर्यंत एकुण तिकीटाच्या 50 टक्के रक्कम भरावी लागत. परंतु आता रेल्वे सुटायच्या 12 तास आधीपासून ते 4 तास आधीपर्यंतच्या काळात ही रक्कम भरावी लागणार आहे.