शालेय विद्यार्थ्याकडून भयानक कृत्य समोर आलं आहे. गणेशोत्सवासाठी जास्त दिवस सुट्टी मिळवण्यासाठी दोन शाळेतील विद्यार्थ्यांनी त्याच्या वर्गमित्राची झोपेत हत्या करण्याचा कट रचला. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात समोर आली आहे. जर गणेश चतुर्थीपूर्वी शाळेच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास शाळेला जास्त दिवस सुट्टी मिळेल. या आशेने त्या दोन्ही विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गमित्राला झोपेत मारण्याचा प्रयत्न केला.
या दोन विद्यार्थ्यांच्या कृत्यानंतर त्या दोघांना निवासी शाळेतून काढण्यात आले आहे. जिल्हा शिक्षण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. 4 सप्टेंबरला एका वसतिगृहातील एका खोलीत 15 विद्यार्थी झोपले असताना ही धक्कादायक घटना घडली. दोन विद्यार्थ्यांनी त्यांच्या खोलीत झोपलेल्या एका विद्यार्थ्याचा गळा दाबून त्याला मारण्याचा प्रयत्न केला. आपला श्वास रोखला जातोय, यामुळे त्याची झोप उघडली. यानंतर तो ओरडू नये म्हणून त्याचे तोंड दाबण्यात आले. पण त्याने आरडा ओरडा केल्यामुळे इतर विद्यार्थ्यांना जाग आली. त्यांनी देखील डोळ्यासमोर कृत्य पाहून घाबरले आणि त्यांनी आरडाओरडा सुरु केला.
मुलांचा आवाज आल्यामुळे वसतिगृहाचे प्रभारी अधिकारी आणि कर्मचारी खोलीत गेले. त्यावेळी पीडित मुलाने आपल्या सोबत झालेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्या दोघांच्या कृत्यामुळे त्या रात्री त्यांना इतर खोलीत डाबून ठेवण्यात आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या विद्यार्थ्याच्या पालकांना बोलून घेतलं.
शाळेकडून सांगण्यात आले, दोन वर्षांपूर्वी या शाळेच्या एका विद्यार्थ्याचा आजारपणामुळे मृत्यू झाला होता. तेव्हा शाळेला दोन दिवस सुट्टी मिळाली होती. हे लक्षात घेत त्या दोन विद्यार्थ्यांनी हा भयानक कट रचला. दोन्ही विद्यार्थ्यांवर शाळेकडून कठोर कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान पीडित विद्यार्थ्याच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.
