पावसाबाबतची एकमेव आशाही मावळली; सप्टेंबरही कोरडा जाण्याची शक्यता; हवामान विभागाने जाहीर केला अंदाज

एल निनो आता अधिक सक्रिय झाला असून त्याचा फटका ऑगस्टमध्ये राज्य आणि देशालाही बसला. आजपासून सुरू होत असलेल्या सप्टेंबरमध्येही हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होईल, असा अंदाज आहे. हवामान खात्याने सोमवारी ही माहिती दिली.

सप्टेंबरमध्ये देशात पावसाची दीर्घकालीन सरासरी १६७.९ मिमी आहे. ऑगस्टप्रमाणे सप्टेंबरमध्येही पश्चिम बंगाल आणि झारखंड येथे पावसाचा दिलासा मिळू शकेल. काही प्रमाणात मध्य प्रदेशात पाऊस पडू शकेल. मात्र, महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल. कमी दाबाच्या प्रणाली या महिन्यातही निर्माण होऊ शकतात. परंतु, या प्रणालीचा फायदा पूर्वेकडील राज्यांना मिळू शकतो. या प्रणाली पश्चिम दिशेकडे येण्याची शक्यता नसल्याने राज्याला फायदा होण्याची शक्यता आतातरी दिसत नसल्याचे हवामान विभागाचे संचालक मृत्युंजय मोहपात्रा यांनी स्पष्ट केले. या काळामध्ये राज्यातील कमाल तापमानही सरासरीपेक्षा चढे असेल.

ती आशा मावळली!

सप्टेंबर महिन्यामध्ये सकारात्मक इंडियन ओशन डायपोल (आयओडी) स्थिती निर्माण होऊन एल निनो सक्रिय असतानाही पाऊस अधिक पडू शकेल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र, सध्या तरी आयोडी तटस्थ असून सकारात्मक दिशेने झुकलेला आहे. सप्टेंबरमध्ये या स्थितीचा पावसासाठी फायदा होण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

पावसाची वाढती तूट

सप्टेंबर अखेरीस देशात पावसाची १३.८ टक्के तर राज्यात १२ टक्के तूट आहे. सप्टेंबरमध्ये पाऊस पडला नाही तर ही तूट आणखी वाढू शकते. ऑगस्ट महिन्यात १६.३ टक्के तूट नोंदली गेली. त्यामुळे एकूण तूट १३.८ टक्के झाली आहे.

जुलैमध्ये विक्रम; ऑगस्टमध्ये पावसाची दडी!

पावसाने पुण्याला जुलैमध्ये अक्षरशः झोडपून काढले आणि १९०७ सालचा ११९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला; मात्र त्यानंतर ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. ऑगस्टमध्ये पुण्यात सरासरीच्या तुलनेत ४४.५ टक्के म्हणजेच केवळ ८०.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ऑगस्ट हा गेल्या काही वर्षांतील सर्वांत कमी पाऊस पडलेला महिना ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *