मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीत आजपासून उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी मराठा समाजाला अंतरवाली सराटीत येण्याचं आवाहन केलंय. मराठा समाजासाठी ही शेवटची लढाई असून कुणीही घरात बसू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे.
58 लाख नोंदींच्या आधारे सर्वांना कुणबी प्रमाणपत्र द्यावं या जुन्या मागणीसह जातपडताळणीत नाकारलेली प्रमाणपत्रही दिली जावेत यासाठी जरांगेंनी उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. तसेच यावेळी त्यांनी थेट जात पडताळणी समितीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. देशात कुठेही जातपडताळणी समिती नाही मग राज्यात का, असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे.
‘बाकीच्या राज्यात जातपडताळणी समिती नाही मग महाराष्ट्रात कशाला? यात मराठ्यांचा फायदा नाही सगळ्यांचाच फायदा. यांना विरोध कशाला करावा हेच कळत नाही. सगळं असूनही जात पडताळणी समिती का व्हॅलिटीडी नाकारते. देशात कोणत्याही राज्यात जात पडताळणी समिती नाही. मग महाराष्ट्रात कशाला? जात पडताळणी समितीला पैसे द्यायचे कुठून ज्यांचा या मागणीला विरोध असेल त्यांनीं विरोध असू द्यावा,’ असं मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
‘शिंदे समितीने शोधलेल्या 58 लाख नोंदीचे कुणबी प्रमाणपत्र तात्काळ द्या. सरकारने कुणबी प्रमाणपत्र वाटप वेगाने वाटप करावे. वाटप करण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांच्या व्हॅलीडिटी द्या. हैद्राबाद गॅझेटीयर नुसार कुणबी प्रमाणपत्र वाटप करून व्हॅलीडिटी कशी देणार हे स्पष्ट करा. कुणबी प्रमाणपत्र आणि व्हॅलीडिटी कोणत्या पद्धतीने देणार हे समजाऊन सांगा,’ अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
‘इथे कोण कोणासाठी एक तास पण देत नाही. मी तुमच्यासाठी तीन वर्ष लेकरा बाळांसाठी देतोय. सरकारने जरी फसवलं तरी तुमच्यासाछीच लढतोय इमानदारीने. हे सरकार सातत्याने आता झुंजावे लागणार आहे. सातारा संस्थान, कोल्हापूरचा जीआरची अमलबदावणी कराची, महाराष्ट्रातील सगळ्या केसेस सरसकट मागे घ्यायच्या. त्या शिवाय हे आंदोलन थांबत नाही. बलिदान दिलेल्या कुटुंबीयांना जोपर्यंत नोकऱ्या मिळत नाही. तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. मराठा समाजाच्या लेकरांना मराठा सजामाच्या मोठ्या लोकांची गरज आहे. गरीब समाजाच्या लेकराला श्रीमंत मोठ्या मराठ्यांची गरज आहे.’ त्यांनी आता समाजाच्या पाठीशी उभं राहा, असं अवाहन जरांगे यांनी केलं आहे.
‘3 वर्षाचा अखंड लढा आता विजयाच्या उंबरठ्यावर आहे. विजयाच्या वेळी विखरून नाही जायचं इकडे-तिकडे. मराठ्यांची ताकद बलाढ्य दिसली पाहिजे. ही शेवटची फाईट आता गाफील राहू नका, अन्यथा दगाफटका होईल,’ असं जरांगे यांनी म्हटलं आहे. मराठ्यांना ओबीसींच्या सोयी सुविधा लागू करण्यासाठी काढण्यात आलेल्या जीआरची अंमलबजावणी करा. आता हे शेवटच आंदोलन प्रत्येकाने घराबाहेर पडा, असं अवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे. तसंच, ‘मी समाजासाठी दिवस रात्र झटतो.तुम्ही उपोषण काळात काळजी घ्या,’ असंही मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.
