मेसेजला सिंगल टिक, नेटवर्क नसेल का? नेपाळमध्ये बेपत्ता जीवलगांच्या कुटुंबांची घालमेल, मुंबई-पुण्यातील ग्रुप संपर्काबाहेर

कितीतरी मेसेज पाठवले तरी एकच ‘टिक’ येतेय… फोन कुठे असेल? चार्ज झालेला नसेल का? नेटवर्क नसेल का? काहीच कळत नाही… मुंबईच्या गटासोबत गेलेल्यांपैकी कुणाशीही संपर्क होत नाहीये… नेपाळमधील पुरानंतर महाराष्ट्रातील पर्यटकांच्या नातेवाईकांची अशीच घालमेल सुरू आहे. शुक्रवारी दुपारपर्यंत ८५ भारतीयांची सुटका झाल्याची माहिती मिळाली असली, तरी महाराष्ट्रातील, त्यातही प्रामुख्याने मुंबई, पुण्याच्या एका गटातील पर्यटकांबाबत अद्याप ठोस माहिती मिळालेली नाही. त्यामुळे एखादा तरी फोन येईल, कुठूनतरी काहीतरी कळेल, या आशेवर नातेवाईक आहेत. ठाण्यातील समीर जोशी व अपर्णा जोशी यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीय हवालदिल झाले आहेत.

आप्तांच्या वाटेकडे कुटुंबीयांचे डोळे

आपल्या बेपत्ता नातेवाईकांची माहिती मिळेल, या आशेने त्यांनी दोन दिवसांमध्ये भारतातील संपर्क क्रमांकांपासून नेपाळ, चीन येथील मिळालेल्या प्रत्येक नंबरवर कित्येकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. अद्याप संपर्क न झालेल्या या गटातील रजनीश नातू यांच्या घरीही सध्या हीच स्थिती असल्याचे त्यांच्या एका स्नेह्यांनी सांगितले. कुठल्या तरी वृत्तवाहिनीवर बेपत्तांबाबत माहिती मिळेल, यासाठी सतत टीव्ही वाहिन्या बदलत, वेबसाइट तपासत ते फोनकडे डोळे लावून बसले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *