भारताशी संपर्क जोडल्याशिवाय जगाशी संपर्क जोडले जाणे अशक्य असल्याचे फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
भारत दौर्यावर आलेले फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी बुधवारी दिल्लीतील आयआयटी येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी उपस्थितांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.
मार्क झुकेरबर्ग यांना पहिलाच प्रश्न विचारण्यात आला की, भारतात एवढी रूची का? यावर ते म्हणाले की, भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे. भारताशी संपर्क जोडल्याशिवाय जगाशी संपर्क जोडले जाणे अशक्य आहे.
यावेळी दुस-या एका विद्यार्थ्यांने प्रश्न केला की, कँडी क्रशचे निमंत्रण बंद करण्यासाठी काय करावे लागेल? या प्रश्नाला मार्क यांनी सांगितले की, आम्ही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. हा गेम फेसबुकवर अत्यंत लोकप्रिय आहे आणि भारतात याचे अनेक फॅन आहेत.
तसेच नेट न्युट्रॅलिटी एक चांगला प्रकार असून त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत. फेसबुकसाठी आम्ही नेहमीच चुका करत राहा आणि त्यातून शिकत राहा, अशा अनोख्या शैलीमध्ये काम केले जात असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देताना प्रामाणिक माहिती दिली.
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९०० विद्यार्थ्यांची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली होती.