महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वीच्या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आला. ज्यानंतर विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाचे वेध लागले. मात्र त्यांच्या उत्साह आणि कुतूहलावर विरजण पडलं ते म्हणजे प्रवेश प्रक्रियेतील काही अडचणींचं. 11 वीसाठीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये असणारा गोंधळ संपता संपत नसल्यामुळं आता या प्रवेश प्रक्रियेला अनुसरून नवं वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे.
नव्या बदलांनुसार इयत्ता अकरावीतील प्रवेशासाठीची पहिली फेरी सोमवार 26 मे 2025 पासून सुरु होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीनं अकरावीची प्रवेश प्रक्रिया 26 मेपासून राबवली जाणार आहे. दरम्यान यापूर्वी 21 मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र 21 आणि 22 मे रोजी सुद्धा अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करणं शक्य न झाल्यानं अकरावीसाठी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया 26 मे रोजी सकाळी 11 वाजता सुरू होईल, असं शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. थोडक्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन प्रवेशासाठी आणखी 4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रवेश प्रक्रियेतील महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे
26 मे ते 3 जूनदरम्यान विद्यार्थ्यांना अकरावीसाठीचा प्रवेश घेता येणार आहे. जिथं साधारण 9 दिवस ही प्रवेश प्रक्रिया सुरू असेल. 5 जून रोजी पहिली जनरल गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, 6 ते 7 जून या तारखांना विद्यार्थ्यांना हरकत नोंदवून तक्रार करता येईल आणि 8 जून या दिवशी अंतिम मेरिट लिस्ट अर्थात गुणवत्ता यादी जाहीर होईल. लक्षात घ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जूनदरम्यानचा काळात आपल्या पसंतीचं महाविद्यालय निवडता येणार आहे.
इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदाच्या वर्षी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिथं एकाच अर्जाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यभरातील महाविद्यालयांचा पर्याय खुला झाला होता. मात्र प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवसापासून अनेक तांत्रिक अडचणींमुळं संपूर्ण प्रवेश प्रक्रियाच कोलमडल्याचं पाहायला मिळालं.