हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावला; पुण्यात वीज पडून कांद्याचा कोळसा, शेतकऱ्याचं मोठं नुकसान

महाळुंगे पडवळ (ता. आंबेगाव) येथील चासकरमळा येथील शेतकरी सुनील बबन चासकर यांच्या कांद्याच्या चाळीवर वीज पडून ती जळून खाक झाली. मंगळवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. चासकर यांच्या कांद्याच्या चाळीवर वीज पडली. यात चाळ जळून खाक झाली.

चाळीतील तीनशे पिशवी कांद्यापैकी बराचसा जळाला. आजूबाजूला घरे नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सरपंच सुजाता चासकर यांच्या घराच्या बाजूलाच ही कांदाचाळ आहे. ती जळाल्याचे लक्षात येताच सुजाता चासकर, सचिन चासकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांसह आग विझवली. चाळ लाकडाची असल्याने आग झपाट्याने पसरली. आमदार दिलीप वळसे पाटील यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी याबाबत तहसीलदार यांना शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

या संदर्भात आंबेगाव तालुक्याचे कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्याचे टाळले. गेले तीन-चार दिवस आंबेगाव तालुक्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ग्रामस्थांना उन्हापासून दिलासा मिळाला असला तरीही शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेले पीक आडवे झाले आहे, अशा शेतकन्यांच्या तक्रारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *