कुणाचं कुंकू गेलं, कुणाची पोरं, कल्याण इमारत दुर्घटनेत सारं गमावलं; चिमुकलीला ढिगाऱ्याबाहेर काढताच आईचा टाहो

सप्तशृंगी इमारतीच्या एका बाजूचा चारही माळ्याचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत तळमजल्यावरील क्षीरसागर कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. पती-पत्नी आणि मुलगा-मुलगी असे चौकोनी कुटुंब असून वडील कामावर गेल्यानंतर आई ज्योती बरोबर मुलगी ऋतुजा आणि मुलगा यश असे तिघेजण घरात होते. तिघेजण उठून स्वयंपाक घरात निघाले. यश मागेच होता. इतक्यात डोक्यावरून किंकाळ्या आणि जोराचा आवाज एकू येताच ते तिघेही बाहेर पळाले. यामुळे थोडक्यात त्यांचा जीव वाचला. तळ मजला असल्याने त्यांना घराबाहेर पळणे सोपे झाल्याने आपण वाचल्याचे ज्योती म्हणाल्या. यशला सायंकाळी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

चिमुकलीचा मृतदेह बाहेर काढताच पालकांचा टाहो

दुसऱ्या मजल्यावर राहणारे श्रीकांत शेलार पत्नी, दोन वर्षाची मुलगी नमस्वी आणि मुलगा श्रावील यांच्यावरोबर राहत होते. दुर्घटना घडली तेव्हा चौघेही घरातच होते. हॉलमध्ये बहीण- भाऊ खेळत होते. इतक्यात त्यांच्या सुखी संसारावर कालाने घाला घातला. मुलांना वाचविण्यासाठी मलब्याच्या दिशेने आई वडिलांनी धाव घेतली, मात्र, या ढिगाऱ्यात काहीच नजरेस पडत नसल्याने त्यांनी एकच टाहो फोडला. शेजाऱ्यांनी त्यांना कसेबसे रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र मलब्यातून कोणाला बाहेर काढले जाते हेच कळत नसल्याने ते हवालदिल झाले होते. पोलिसांनी त्या दोघांना रोखून धरले होते.

श्रावीलला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याचे कळताच आईचा जीव भांडयात पडला. मात्र, चिमुकली कधी सापडेल तो सुरक्षित असेल ना हे पाहण्यासाठी त्या माउलीची धडपड सुरू होती. बचाव पथकाने मुलीचा मृतदेह बाहेर काढताच ती नमस्वी असल्याचे आई-वडिलांच्या लक्षात आले. वडिलांनी मुलीच्या मृतदेहाकडे धाव घेतली. आईने हंबरडा फोडला. रुग्णालयात मुलीचा निष्प्राण देह पातून आई निपचित कोपऱ्यात शून्य नजरेने पाहत होती. आपली मुलगी आपल्याला परत कधीच दिसणार नाही, या विचारानेच ती व्याकूळ झाली होती. तिचे सांत्वन करण्यासाठीदेखील कोणी नव्हते. तर वडिलांनी थेट खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलाच्या दिशेने धाव घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *