मुंबईसह उपनगरात अनेक वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. कांदिवली, बोरिवरी, दहिसर, कुर्ला, सायन आणि ठाण्यात जोरदार वाऱ्यासह पाऊस आला. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडला.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मुंबईसह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. मे महिना सुरु असून अंगाची उन्हामुळे लाही लाही होत असताना अचानक पावस आल्यामुळे वातावरण थोडा गारवा आला आहे. तर अंबरनाथमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक भागांतील वीज पुरवठा खंडित झाल्याची माहिती समोर आली आहे.
आज सायंकाळी वसई-विरार परिसरात अचानक आलेल्या जोरदार वादळ आणि मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तासाभराच्या मुसळधार पावसात अनेक झाडे रस्त्यावर कोसळली, वीजेचे खांब पडले आणि वाहतूक ठप्प झाली. या वादळाचा फटका विविध सामाजिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांनाही बसला. अनेक ठिकाणी लग्नसोहळ्याचे मंडप वाऱ्यामुळे उध्वस्त झाले.
कल्याणमध्येही सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ज्यामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली. तसेच पावसामुळे कल्याणमध्ये अनेक ठिकाणी बत्ती गुल झाली आहे. महावितरणकडून वीज पुरवठा सुरळीत करण्यात अडचणी येत आहेत.
शहापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यामुळे अनेक भागांत झाडांची पडझड झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे घरांचे पत्रेही उडाले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्याने अनेक गावं अंधारात आहेत.
रात्रीच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने पालघर जिल्ह्यातील अनेक भागात हाहाकार माजवला. समुद्रकिनारी असलेल्या अनेक बोटी एकमेकांवर आदळून मोठ्या प्रमाणात मच्छीमारांचा नुकसान झाला आहे .तर दुसरीकडे ग्रामीण भागातील उन्हाळी भात शेती त्याचप्रमाणे वीट भट्ट्या आणि अनेक घरांची छप्पर उडून नुकसान झाला आहे. तर दुसरीकडे सात आणि आठ मे या दिवशी मोठ्या प्रमाणात लग्नसराई आहेत. त्यामुळे ह्या या लग्नासाठी उभारलेले मांडव वादळी वाऱ्याने उडवले आहेत.
