दक्षिण मुंबईतून एक तासांत विरारला पोहोचता येणार; 87 हजार कोटींचा नवीन प्रकल्प, समुद्रातून जाणार रस्ता!

दक्षिण मुंबई थेट पालघरला जोडता येणार आहे. त्यामुळं नागरिकांचा रस्ते मार्गे प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.  उत्तन-विरार सागरी सेतू प्रकल्पाच्या 87 हजार 427 कोटी रुपये खर्चाला नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजूरी देण्यात आली आहे. तसंच, या प्रकल्पासाठी नाममात्र दरात जमीन देण्याची मागणी करण्याचा निर्णयही देण्यात आला आहे.

उत्तन-विरार सागरी सेतू थेट मुंबई-दिल्ली एक्स्प्रेस वेबरोबर विरारजवळ जोडला जाणार आहे. त्यामुळे गुजरात आणि दिल्लीवरून येणाऱ्या वाहनांना विनाअडथळा थेट मुंबईला पोहोचणे शक्य होणार आहे. त्याची एकूण लांबी ५५.४२ किमी असेल. राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्याला मान्यता दिल्यावर परदेशी वित्तीय संस्थांकडून कर्ज उभारण्याच्या मंजुरीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे. तसेच केंद्राकडे सार्वभौम हमीचाही प्रस्ताव मांडला जाईल.

नरीमन पॉइंट ते विरार प्रवास एका तासात

मरीन ड्राईव्ह ते विरार अशा सागरी मार्गाची उभारणी केली जात आहे. पालिकेने उभारलेला मरीन ड्राईव्ह ते वरळी कोस्टल रोड वाहतुकीसाठी खुला झाला असून वांद्रे-वरळी सी लिंक वापरात आहे. सद्यस्थितीत एमएसआरडीसीकडून वांद्रे वर्सोवा सागरी सेतूचे काम सुरू आहे. त्यापुढे वर्सोवा ते भाईंदर कोस्टल रोड उभारण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. तर एमएमआरडीएकडून उभारण्यात येणाऱ्या भाईंदर ते विरार सागरी मार्गामुळे दक्षिण मुंबईतून थेट विरारपर्यंत विनाअडथळा पोहोचणे शक्य होईल. त्यातून नरिमन पॉइंट येथून विरार येथे पोहोचण्यासाठी केवळ एक तासाचा वेळ लागणार आहे. प्रकल्पाची किंमत 87,427 रुपये इतकी आहे. विरार कनेक्टर 18.95 किमी इतका असून प्रकल्पाची एकूण लांबी 55.45 किमी आहे. सागरी सेतू 24 किमी असून वसई कनेक्टर 2.5 किमी आहे. तर, उत्तन कनेक्टर 10 किमी असणार आहे. समुद्रातील रस्त्यावर एकूण 8 मार्गिका असणार आहेत. प्रत्येक दिशेला 4 लेन असणार आहेत.

ठाणे, वसई, विरार, नवी मुंबईत विस्तारणार मेट्रोचे जाळे 

मुंबई महानगरातील मेट्रो जाळ्याचा आणखी विस्तार होणार आहे. येत्या वर्षात ‘एमएमआरडीए’ मार्फत ४ नव्या मेट्रो प्रकल्पांची कामे हाती घेतली जाणार आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. यामुळे ठाणे, वसई विरार आणि नवी मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. ‘एमएमआरडीए’ने हाती घेतलेली मेट्रो १४ मार्गिका ३८ किमी लांबीची असून तिच्यावर १५ स्थानके असतील. यासाठी १८ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया ‘एमएमआरडीए’ने सुरू केली आहे. मीरा रोड येथील शिवाजी चौक येथून विरारपर्यंत जाणाऱ्या मेट्रो १३ तसेच गायमुख ते शिवाजी चौक मेट्रो १० मार्गिकेचे काम हाती घेतले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *