किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पाचा वाद चांगलाच चिघळला आहे. या मुद्द्यावरुन राज्यात दोन गट पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. छत्रपती संभाजीराजेंनंतर आता संभाजी ब्रिगेडने आता या वादात उडी घेतली आहे. एक मेपर्यंत रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा असं अल्टिमेटम संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला दिले आहे. राज्य सरकारने हे अल्टिमेटम पाळलं नाही तर एक मेनंतर संभाजी ब्रिगेड पुन्हा एकदा रायगडावरील वाघ्या पुतळा हटवणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिला आहे.
संभाजी भिडेंना आव्हान
छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. संभाजीराजेंच्या भूमिकेला राज्य सरकार काय प्रतिसाद देतेय याची आम्ही वाट पाहतोय. ‘मराठा जोडो’ यात्रा संपल्यानंतर एक मे रोजी आम्ही स्वतः पुतळा काढणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. “संभाजी भिडे वाघ्या कुत्र्याला ऐतिहासिक संदर्भ असल्याचा पुरावा देत आहेत पण त्यांचा पुरावाही आम्हाला मान्य नसून त्यांनी आमच्या सोबत चर्चेला यावं,” असं आव्हान ही संभाजी ब्रिगेडने संभाजी भिडेंना दिलं आहे. मराठा सेवा संघाची ‘मराठा जोडो’ यात्रा धाराशिव जिल्ह्यात आली असून यावेळी सौरभ खेडेकर यांनी हे वक्तव्य केले आहे.
