मुंबईतील शिवडी न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात मुंबईतील या नव्या आणि देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या सागरी सेतूचं लोकार्पण काही दिवसांपूर्वीच पार पडलं. या सेतूच्या उद्घाटन सोहळ्यापासूनच अनेकांनी ही वाट पारवासासाठी वापरली आणि प्रवासाचा एक वेगळा अनुभव घेतला. मुंबई आणि नवी मुंबई , उरण पनवेल अशा ठिकाणांमधील अंतर मोठ्या फरकानं कमी करणारा हाच अटल सेतू आता चक्क मुंबई आणि पुण्यातील अंतर आणि प्रवासाचा वेळही कमी करणार आहे.
मुंबई- पुण्यातील प्रवासाचं अंतर कमी करणाऱ्या एका जोड मार्गिकेच्या अर्थात जोडरस्त्याच्या बांधकामाचं काम आता लवकरच सुरु होणार असून, हा रस्ता 6.50 किमी अंतराचा असेल. एप्रिल 2024 पासून त्याच्या निर्मिती प्रक्रियेस सुरुवात होणार असून, एमएमआरडीएकडून या रस्त्यासाठीच्या विकासकाच्या नियुक्तीलाही मंजुरी दिल्यामुळं आता बांधकाम प्रक्रियेला वेग मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. गावर कन्स्ट्रक्शन कंपनी या कंपनीकडे या रस्त्याच्या कामाची जबाबदारी राहणार असून, हा मार्ग पूर्णपणे तयार झाल्यानंतर मुंबईहून कुठंही थांबा न घेता थेट पुणे गाठता येणार आहे.
सिग्नल यंत्रणा नसल्यामुळं या मार्गावरून इंधनाची बचत तर होणार आहेच. पण, त्याशिवाय प्रवाशांचा वेळही वाचणार आहे. 22 किमी अंतराच्या अटल सेतून इथं मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही महत्त्वाच्या शहरांमधील अंतर अवघ्या 20 मिनिटांवर आणून ठेवलं. आता जोडरस्त्यानं हा अट सेतू मुंबई पुणे एक्सप्रेस वेशी जोडला जाणार आहे. त्यामुळं अटल सेतूनवरून उतरून वाहतूक कोंडीत वेळ न दवडता आता कनेक्टर सेतूच्या चिर्ले इंटरचेंजमुळं मुंबईच्या शिवडीहून निघालेलं वाहन न थांबता थेट तासाभराहूनही कमी वेळामध्ये म्हणजेच साधारण 50 ते 55 मिनिटांच्या कालावधीत हा प्रवास शक्य होणार आहे.
कधी पूर्ण होणार हा आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प?
राज्यातील दोन महत्त्वाच्या मार्गांना जोणारा हा प्रकल्प 30 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 6.50 किमी अंतराच्या या मार्गासाठी साधारण 1102.75 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. दोन रेल्वे पुलांवरून जाणाऱ्या या कनेक्टरसाठी जवळपास 5.50 हेक्टर भूखंड संपादन केला जाणार आहे.
