नाताळ आणि नववर्षानिमित्त मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जात असून रेल्वेगाड्यांचे तिकीट आरक्षण १०० टक्क्यांच्या पुढे गेले आहे. प्रवाशांना आरक्षित तिकीट देण्याचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते. तसेच अनेक वेळा बनावट ई-तिकिटे दिली जातात. याविरोधात पश्चिम रेल्वेची कारवाई सुरू आहे.
याप्रकरणी सिल्वासा शहरातील रहिवासी शशी प्रकाश सिंग याला पश्चिम रेल्वे दक्षता पथक आणि सिल्वासा शहर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ई-तिकीट बनविण्याच्या आरोपाखाली पकडले. इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (आयआरसीटीसी) संकेतस्थळावरून बेकायदेशीरपणे ३३ लाख रुपयांहून अधिक किमतीची ई-तिकीटे खरेदी करताना सिंग आढळून आला. ही सर्व तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.
