पोहता येत नसल्याने दोन सख्ख्या भावांचा बुडून अंत, लेकरांना पाहताच माऊलीचा टाहो; अख्खं गाव हळहळलं

सातारा जिल्ह्यातील हिवरे (ता. कोरेगाव) येथे माती नालाबांधामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ऋतुराज रोहिदास गुजले (वय १४) आणि वेदांत रोहिदास गुजले (वय १२) असं मृत मुलांचे नाव आहे. हिवऱ्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.

 काल शाळेला सुटी असल्याने त्यांची आई सुवर्णा गुजले यांनी दोन मुलांना शेतामध्ये नेले. आईचे खुरपणीचे काम चालले होते. यावेळी दोघे भावंडे शिवारात जनावरे चारत होती. दुपारी आईने दोन्ही मुलांना शेतात बोलावून जेवू घातले. पुन्हा ही मुले जनावरे चारण्यासाठी शिवारात गेली. दरम्यानच्या काळात ते दोघे शेताजवळ असलेल्या नाईक इनामदार शिवारातील माती नालाबांधात पोहण्यासाठी गेली. ऋतुराज यास पोहण्यास येत होते. मात्र, वेदांत यास पोहण्यास येत नव्हते. सायंकाळी पाच वाजता त्यांची आई त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी येथील शिवारात गेली तेव्हा माती नालाबांधा जवळ गेली असता तिला बांधाजवळ दोघांची कपडे दिसली. मात्र, दोघे मुले दिसली नसल्याने सुवर्णा गुजले यांनी ही माहिती त्यांचे पती रोहिदास गुजले यांना दिली.
रोहिदास हे साखर कारखान्यावर उसाचा ट्रॅक्टर घेऊन गेल्याने त्या ठिकाणी रोहिदास यांचा भाऊ नीलेश गुजले हा माती नालाबांधाजवळ पोहोचला. दरम्यान, गावातील तरुणांच्या मदतीने माती बांधामधील पाण्यात शोध घेतला असता रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान पाण्यामध्ये दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वाठार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची फिर्याद नीलेश गुजले यांनी वाठार पोलीस ठाण्यात दिली असून, घटनेचा तपास पोलीस हवालदार उदय जाधव करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *