नाशिकच्या लासलगावला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा बसलाय. त्यात विंचूर रस्त्यावरील एका व्यापाऱ्याची कांद्याची चाळ जमीनदोस्त झालीय. या चाळीत लाखो रुपयांचा कांदा साठवून ठेवला होता. मुसळधार पावसामुळे चाळ जमीनदोस्त झाली आणि कांदा भिजला. यामुळे व्यापाऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालंय. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय. वेचणीला आलेला कापूस भिजलाय. त्यामुळे आता तो कवळीमोल किमतीत शेतकऱ्यांना विकावा लागणारेय. धुळे, नंदुरबारमध्ये कापूस हे मुख्य पीक आहे. इथली अर्थव्यवस्था कापसावर निर्भर आहे. मात्र कापूस भिजल्यामुळे उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम होणारेय. पंचनामे करुन तातडीनं मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
तूर, कापूस पिकाचं नुकसान
अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेती पिकांना झोडपून काढलंय. कापूस , तूर पिकांचं मोठं नुकसान झालंय. वेचणीला आलेला कापूस पूर्णपणे भिजल्याने कापसाची पूर्ण प्रतवारी खराब झालीये. त्यामुळे बळिराजा आर्थिक संकटात सापडलाय. वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे तूर पिकाचं मोठं नुकसान झालंय. तुरीचं पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. मात्र पावसामुळे फुलगळ होऊन तुरीचं पीक भूईसपाट झालंय. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यताय. तर कपाशीसह रब्बीच्या गहू, हरभरा आणि फळबागांना अवकाळी पिकांचा फटका बसणारेय. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेत.
फळबागा आडव्या
धुळे जिल्ह्यातील मोठ्या क्षेत्राला अवकाळी पावसाचा फटका बसलाय. काढणीला आलेला कापूस, भात या पिकासह फळबागांचा मोठा नुकसान झालंय. जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, साक्री या तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाचा दुष्परिणाम दिसून आलाय.तत्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय. शिरुर तालुक्यातल्या टाकळी हाजी परिसराला गारपिटीचा तडाखा बसलाय. याठिकाणी द्राक्ष बागांचं मोठं नुकसान झालंय. पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करतायत
डाळिंब बागांचं नुकसात
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्याला रात्री वादळी वाऱ्या सह गारपिटीनं जोरदार तडाखा दिलाय. टाकळी हाडी परिसरातील शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. चारा जमीनदोस्त झाल्यानं जनावरांचे हाल होण्याची शक्यताय. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरला गारपीटीच्या पावसाचा जोरदार तडाका बसल्याने डाळिंब बागांचे प्रचंड नुकसान झालं असून डाळिंबाची फुलगळ आणि पानगळ मोठ्या प्रमाणात झाली असून गारपीटीच्या तडाख्याने डाळिंब बागांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याने शेतकऱ्यांचा लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेलाय.
तात्काळ मदतीची मागणी
नुकसानग्रस्त द्राक्ष उत्पादकांना तात्काळ मदत द्या अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघाने केलीये. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत देण्याची मागणी करण्यात आलीये.रविवारपासून नाशिक जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडतोय. यामध्ये हजार हेक्टरवरील द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय…
अहवाल पाठवण्याच्या सूचना
अवकाळी पावसा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. कुठे किती नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेऊन पाठवण्याचा सूचना दिल्यात. निश्चितपणे राज्य सरकारची भूमिका कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांचा मदत करतोच। वेगवेगळ्या ठिकाणी रब्बी पीक वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहे, पण जिथे नुकसान होईल त्या ठिकाणी सरकार नक्कीच मदत करणार आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितंलय.
