शाळेत असताना लहान मुलांना कायम एक भीती वाटतं असते, आपल्याला वर्गात कोणी कुलूप लावून निघून गेलं तर…आई, बाबा आपल्याला शाळेत घ्यायला आले नाही तर…अशीच धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या एका शाळेत चिमुकलीच्या आयुष्यात ही भीती खरी ठरली. पहिल्या वर्गात शिकणारी मुलगी शाळेतील वर्गात बंद झाली.
उम्मेखैर मुजम्मिल नावाची ही चिमुकली नेहमी प्रमाणे सकाळी आठ वाजता शाळेत आली. तिने विचारही केला नसेल आज तिच्यासाठी काय संकट उभं ठाकलं आहे. रोजप्रमाणे शाळाची घंटा झाली साडेबारा शाळा सुटली. 25 सप्टेंबरला शाळा सुटली आणि मुलं घरी निघाली. त्यामुळे शाळेतील वॉचमन विठ्ठल बमने याने सर्व वर्ग कुलूप लावून बंद केली आणि तोही घरी निघून गेला.
अचानक त्या चिमुकलीच्या लक्षात आलं की आपण वर्गात एकटं राहिलो आहोत. ती दाराकडे धावली पण दार बाहेरुन बंद होतं. ती रडकुंडीला आली होती. जीव मुठीत घेऊन ती दार जोरजोरात ठोठावत होती. पण कोणीही तिला मदतीला येत नव्हतं. हळूहळू दिवस चढायला लागला घरी आईदेखील कासावीस झाली लेक घरी कशी नाही आली. तिला वाटतं नक्की मैत्रीणींसोबत खेळ बसली असणार…अनेक तास उलटून गेले होते.
तिच्या आक्रोश वाढत होता, शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना एका लहान मुलींचा रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी शाळेकडे धाव घेतली आणि हा सगळा प्रकार समोर आला. त्या मुलीच्या पालकांना या घटनेची माहिती देण्यात आली. तेही धावपळत शाळेत पोहोचले तर लेक वर्गात बंद होती आणि बाहेरुन कुलूप लागलं होतं. त्यांनी दारावरील कुलूप तोडलं आणि मुलीची सुटका केली.
शाळेचा हा भोंगळ कारभार या घटनेमुळे चव्हाट्यावर आला आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या वॉचमन आणि शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली होती. या घटनेची दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने वॉचमनला निलंबित केलं आहे.
