मुंबई, ठाणेसह पालघर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा

ऑगस्ट महिन्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून मुंबई शहर तसेच उपनगरांत दमदार हजेरी लावली. गुरुवारी पहाटेपासून सर्वत्र चांगला पाऊस झाला. मुंबईमध्ये गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस कोसळत होता. मुंबईत शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान, हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई शहर, तसेच उपनगरांत शुक्रवारी सकाळपासून संततधार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला असून पुढील दोन ते तीन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानुसार गुरुवारपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात शुक्रवारीही पावसाचा मुक्काम कायम होता.

ओडिशा आणि छत्तीसगड येथे असलेली चक्रीय वात स्थिती, पूर्व पश्चिम कमी दाबाचे क्षेत्र, तसेच अरबी समुद्रावरून येणारे वारे आणि मान्सूनचा आस मूळ स्थितीपासून दक्षिणेकडे सरकल्यामुळे राज्यात पाऊस आहे. दरम्यान, कोकण, उत्तर महाराष्ट्र, तसेच विदर्भात ९ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *