भारताला स्वातंत्र मिळवून 76 वर्ष उलटली आहेत. या कालावधीत देशाने खूप प्रगती केली. देश चंद्रावर पोहोचला आहे. जगभरात भारताचे कौतुक होत आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचाही मोलाचा वाटा आहे. असे असताना येथे काही गावे अजुनही दुर्देवी आयुष्य जगत आहेत. या गावाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील 26 गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. याठिकाणी सौर ऊर्जेची योजना दिलेली आहे. तीही फक्त नावालाच असल्याचं गावकरी सांगतात. या गावांना वीज नसल्याने या परिसरातील नागरिकांना दळणवळणांच्या मोठ्या समस्या उद्भवत आहेत. धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील 26 गावातील कुटुंबांना वीज मिळाली नाही.
वीजच नसल्याने गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चालले आहे. वीज नसल्याने इथल्या गृहीणी पारंपारिक पद्धतीने भाकरी बनवतात. तसेच महिला जात्यावर महिला दळण दळताना दिसून येतात.
