ऑगस्टमध्ये मुंबईतील १० हजार ४४३ घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्काच्या रूपात ७७३ कोटी रुपये महसूल मिळाला आहे.
मागील काही महिन्यांपासून मुंबईतील घर विक्री स्थिर आहे. साधारण ९ हजार ते १३ हजार या दरम्यान घरांची विक्री होत असून आता सणासुदीच्या काळात दसरा, दिवाळीत घरांच्या विक्रीत वाढ होईल, अशी आशा बांधकाम उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जानेवारी, फेब्रुवारी, एप्रिल, मे, जून आणि जुलै या महिन्यांत ९ ते ११ हजारादरम्यान घरांची विक्री झाली असून केवळ मार्चमध्ये १३ हजार घरांच्या विक्रीचा टप्पा पार केला होता.
मार्चमध्ये १३ हजार १५१ घरांची विक्री झाली होती आणि यातून १२२५ कोटी रुपये इतका महसूल मिळाला होता. एकूणच या वर्षातील आठ महिन्यांच्या कालावधीत घरविक्री १४ हजारांचाही टप्पा पार करू शकलेली नाही. मार्च २०२१ मध्ये १७ हजार ७२८ घरांची विक्री झाली होती. तर मार्च २०२२ मध्ये १६ हजार ७२६ घरांची विक्री झाली होती. यातून सरकारला ११६० कोटी रुपये महसूल मिळाला होता. पण आता मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात घरांच्या विक्रीत वाढ होईल, अशी बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांना अपेक्षा आहे.
