यूपीएससी ही देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. यासाठी देशभरातील लाखो विद्यार्थी तयारी करत असतात. पण यातील मोजकेच उत्तीर्ण होतात. खडतर परिस्थितीवर मात करत ते यशाला गवसणी घालतात. हरियाणा निधी सिवाच देखील त्यापैकी एक आहे. एकीकडे कुटुंबीय त्यांच्यावर लग्नासाठी दबाव आणत असताना तिला यूपीएससी उत्तीर्ण करुन आपले स्वप्न पूर्ण करायचे होते. तिच्या यशाची कहाणी जाणून घेऊया.
मुली वयात आल्या की लग्न करायचे असा आपल्याकडे समज आहे. त्यामुळे लग्नाआधी मुलींना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कमी वेळ मिळतो. हरियाणाच्या गुरुग्राममध्ये राहणाऱ्या निधी सिवाचला इंजिनीअरिंग करायचं होतं. बारावी उत्तीर्ण झाल्यावर तिने मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखेत प्रवेश घेतला होता. यानंतर निधी सिवाचने हैदराबादमधील एका कंपनीत दोन वर्षे कामदेखील केले. पण तिच्या आयुष्यात काहीतरी वेगळं लिहिलं होतं.
मेकॅनिकल इंजिनीअर मुलीने नोकरी सोडून निधी यूपीएससीची तयारी करु लागली. पण हे वाटते तितके सोपे नव्हते. तिच्या कुटुंबीयांना हा निर्णय आवडला नव्हता. पहिल्या दोन प्रयत्नात निधीला अपयश आले होते. तेव्हा तिच्या कुटुंबीयांचा संयम सुटू लागला. आता तिसरा प्रयत्न शेवटचा असेल असे तिला सांगण्यात आले. या प्रयत्नात यश मिळाले नाही तर आम्ही सांगू तिथे तुला लग्न करावे लागेल असे तिला सांगण्यात आले.
यूपीएससीची आणखी जोरदार तयारी करुन नागरी सेवेत जायचे की घरच्यांच्या म्हणण्याप्रमाणे लग्न करायचे? हे दोनच पर्याय तिच्यासमोर होते. अशावेळी कुटुंबीयांची धमकी तिने एक आव्हान म्हणून स्वीकारली. यानंतर पुढचे सहा महिने तिने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. या कालावधीत तिने दिवस रात्र एक करत यूपीएससीची तयारी केली. यूपीएससीची परीक्षा दिली. आलेला निकाल पाहून तिच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. निधीला ऑल इंडिया 83 वा रॅंक मिळाला होता.
निधी सिवाचने यूपीएससी परीक्षेसाठी कोणतेही कोचिंग लावले नव्हते. सेल्फ स्टडीच्या आधारावर तिने हे यश मिळवले. मेहनत करणाऱ्यांची कधी हार होत नाही, हेच यातून सिद्ध होत आहे.
