ठाण्यात १ सप्टेंबरपासून नवे पर्व; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ मोहिमेंतर्गत स्वच्छताकामात मोठे बदल

सकाळी साडेआठ वाजण्यापूर्वी मुख्य रस्त्यांची सफाई, दुपारी ४ ते १२ या वेळेत दुसऱ्या टप्प्यात स्वच्छता, सकाळ-संध्याकाळ उपस्थित कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे वेगवेगळे रंग, त्रिकोणी झाडूच्या सहाय्याने स्वच्छता, कचरा वाहण्यासाठी नवे डबे आणि यांत्रिकी गाड्यांची वाढलेली संख्या, अशा नव्या बदलांनी ठाणे शहरात स्वच्छतेचे नवे पर्व सुरू होणार आहे. ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ या मोहिमेअंतर्गत १ सप्टेंबरपासून शहर स्वच्छतेविषयी नवे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या नव्या बदलासह ठाणे शहराची स्वच्छता यंत्रणा नव्या रूपात येणार असून त्यांच्याकडून शहराचे रूपडे पालटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा ठाणेकरांकडून व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात स्वच्छतेसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात आली असून त्याच्या कर्मचाऱ्यांकडून शहर स्वच्छ केले जाते. १ सप्टेंबरपासून या सफाई कंत्राटदारांच्या कंत्राटाचा नवा कालावधी सुरू होत आहे. शहरामध्ये एकूण २३ गटांकडून वेगवेगळ्या वेळेत कामे केली जाणार आहेत. यावेळी नागरिकांना स्वच्छतेचा चांगला अनुभव यावा, यासाठी संबंधित कंत्राटाच्या अटीमध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. दररोज सकाळी सहा वाजता रस्तेस्वच्छतेचे काम सुरू होऊन सकाळी ८.३० वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांची स्वच्छता पूर्ण होईल. त्यानंतर अंतर्गत रस्ते साफ केले जातील. तर, दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत दुसऱ्या टप्प्यातील स्वच्छता केली जाणार आहे.

कर्मचाऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य

कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना यापुढे वेगळे गणवेश दिले जातील. त्यातही सकाळी काम करणाऱ्यांचा गणवेश रंग वेगळा असेल. तर, संध्याकाळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गणवेश वेगळा राहील. महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी पूर्वीप्रमाणेच खाकी गणवेश परिधान करतील. या सर्व कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत होतील व त्यांच्या व कुटुंबीयांच्या आरोग्याची नियमितपणे तपासणी केली जाईल, या बाबींचीही काळजी घेण्यात आली आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याशिवाय कंत्राटदारास मोबदला दिला जाणार नाही.
महापालिका क्षेत्रात स्वच्छतेच्या कामासाठी एकूण २३ गट कार्यरत आहेत. त्यात आता ओवळा भागासाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या ठाण्यातील स्वच्छतेच्या कामाला स्वतंत्र मनुष्यबळ मिळणार आहे. निरीक्षक आणि त्यांच्यासोबतच विभागनिहाय स्वच्छता कर्मचारी असे गट महापालिका क्षेत्रात कार्यरत असतात. एकूण १३ कंत्राटदारांच्या मदतीने २३ गटांच्या मार्फत शहर स्वच्छतेचे काम केले जाणार आहे. आतापर्यंत लांब झाडूने सफाई करण्याची पद्धत होती. यापुढे सर्व स्वच्छता कर्मचाऱ्यांना कडक काड्या असलेले त्रिकोणी झाडू देण्यात येणार आहेत. या झाडूमुळे अधिक चांगली स्वच्छता करता येईल. रस्त्यावर चिकटलेला कचरा, ओली माती काढणे, कोपरे साफ करणे या झाडूमुळे शक्य होणार आहे.

कचरा वाहण्यासाठी नवीन डबे

रस्ते झाडून जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी आतापर्यंत पत्र्याची गाडी वापरली जात असे. यापुढे टप्प्याटप्याने सगळीकडे १२० किंवा २४० लिटरचे डबे दिले जाणार आहेत. तर, काँक्रीट रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी सध्या दोन गाड्यांद्वारे यांत्रिकी सफाई केली जात आहे. त्यात लवकरच आणखी चार गाड्यांची भर पडणार आहे. एकूण सहा गाड्यांद्वारे प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने स्वच्छता करून त्या रस्त्यांवरील मोकळे झालेले मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *