बासुंदी खाताच तब्येत बिघडली, सांगलीतील आश्रमशाळेत ४० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातल्या उमदी गावात एका आश्रम शाळेतील ४० हून अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातील जेवण खाल्ल्यानंतर विषबाधा होऊन त्यांना उलट्यांचा त्रास सुरू झाला. हा प्रकार हा रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडला.

विद्यार्थ्यांना अचानक उलट्यांचा त्रास सुरू झाल्याने माडग्याळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. तर काही विद्यार्थ्यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय पथक आणि उमदी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात आले.

याबाबत घटनस्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील जत शहरापासून उमदी हे गाव ६० किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी समता या नावाने आश्रमशाळा आहे. या आश्रमशाळेत सध्या १५० ते २०० विद्यार्थी आहेत. गरीब परिस्थिती असल्याने या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.

रविवारी उमदी गावात एका कुटुंबाचा कार्यक्रम होता. सदर कार्यक्रम झाल्यानंतर रात्री शिल्लक जेवण हे समता आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते. सदरचे जेवण रात्री विद्यार्थांनी जेवले. काही वेळातच विद्यार्थ्यांना उलट्या आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. याची माहिती मिळताच आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी धाव घेतली.

मिळेल त्या गाडीतून विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांना अधिक त्रास जाणवू लागला त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. जेवणातील बासुंदी खाल्ल्याने या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे घटनस्थळी बोलले जात होते.

सदर आश्रम शाळेतील मुलांचे वय पाच वर्षापासून ते पंधरा वर्षाच्या आतील आहेत. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलीस, ग्रामीण रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी धाव घेतली होती. या घटनेनं संपूर्ण जत तालुक्यात खळबळ उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *