तळीयेतील ६६ बाधित कुटुंबांची हक्काच्या घराची प्रतीक्षा अखेर संपणार

महाड, तळीये येथील दरड दुर्घटनेतील ६६ बाधित कुटूंबांसह धोकादायक ठिकाणच्या १९७ कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाकडून २६३ घरांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यातील २०० घरांचे काम सध्या सुरू असून बाधित कुटुंबासाठीच्या ६६ घरांचे काम अखेर पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे आता या घरांचा ताबा ६६ बाधित कुटुंबांना देण्याचा निर्णय रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यानुसार लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते घरांचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच ६६ कुटुंबांच्या घरांची प्रतीक्षा संपणार आहे.

 महाड, तळीये येथील कोंढाळकरवाडी येथे जुलै २०२१ मध्ये दरड कोसळली. या दुर्घटनेत ६६ घरे गाडली गेली. तर ८७ जणांचा मृत्यू झाला. ८७ पैकी अंदाजे ५४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित मृतदेह मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. या दुर्घटनेनंतर तत्कालीन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या माध्यमातून घरे बांधली जातील असे जाहीर केले. प्री फॅब पद्धतीने घरे बांधण्याचा निर्णयही त्यांनी घेतला. या पद्धतीने घरांचे काम वेगात होत असल्याने सहा महिन्यात घरे देऊ असेही त्यांनी जाहीर केले होते. पण आता दोन वर्षे होत आली तरी घरे पूर्ण झालेली नाहीत.

दरम्यान सुरुवातीला केवळ ६६ बाधितांसाठीच घरे बांधली जाणार होती. पण पुढे दुर्घटनेचा धोका असलेल्या इतर घरांचा शोध घेत एकूण २६३ घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी १४.६४ हेक्टर जागा संपादित करून ती म्हाडाला दिली. या जागेवर २६३ पैकी २०० घरांच्या कामाला सुरुवात झाली. २०० पैकी बाधितांसाठीची ६६ घरे प्राधान्याने पूर्ण करून घरांचा ताबा देण्याचे म्हाडाने जाहीर केले. आतापर्यंत यासाठी अनेक तारखा देण्यात आल्या असून शेवटची तारीख मार्च २०२३ अशी होती. मार्चमध्ये घरे पूर्ण करून ती जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग केली जाणार होती. पुढे जिल्हाधिकाऱ्यांकडून घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया राबविली जाणार होती. मात्र मार्चमध्ये घरे बांधून झाली नाहीत. त्यामुळे ६६ जणांची घराची प्रतीक्षा कायम होती.

आता मात्र ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कारण ६६ घरांचे काम पूर्ण झाले असून लवकरच ही घरे म्हाडाकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग केली जातील. त्यानंतर ताबा देण्याची प्रक्रिया सुरू होईल. पुढील आठवड्यात ताबा देण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते घरांचा ताबा देण्यात येणार असून त्यासाठी त्यांची वेळ घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *