दिवसभर विहिरीत ठेवायचे, बाहेर काढून साखळ्यांनी बांधायचे, दारुतून गुंगीचं औषध द्यायचे; धाराशिवमध्ये मानवी तस्करी

२१ व्या शतकातही महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात मानवी तस्करी होतेय, हे जर सांगितलं तर कोणाला खरं वाटणार नाही, पण हे सत्य आहे. धाराशिव जिल्हयातील ढोकी पोलीसांनी तस्करी केलेल्या ११ मजुरांची सुटका केली आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या राज्यात धक्कादायक घटना उजेडात आली आहे. वाशिम, औरंगाबाद, हिंगोली, जालना, मध्य प्रदेश, नांदेड, बुलढाणा येथील मजुरांची तस्करी उस्मानाबाद जिल्हयातील भुम येथील दलाला मार्फत झाली. अवघ्या दोन-चार हजार रुपयांच्या मोबदल्यात या मजुरांची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघड झाला आहे.

गुत्तेदाराकडून या मजुरांचा अमानुष छळ केला जात असे. तालुक्यातील वाखरवाडी येथील ६, तर कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ५ अशा एकूण ११ मजुरांचा छळ गुत्तेदार कृष्णा बाळु शिंदे, संतोष शिवाजी जाधव सह इतर दोघे करायाचे. विहिरीत सकाळी कामाला सोडले की, दिवसभर तेथेच ठेवायचे. संडास, लघवी, दिलेले जेवण सगळे विहिरीत करायचे. रात्री विहिरी बाहेर काढले की, पायाला साखळदंड बांधले जायचे. हातभट्टी दारुमध्ये गुंगीचे औषध देऊन त्यांना शांत झोपवले जायचे. मजुरांनी विरोध केला तर पाईपने मारहाण केली जात असे.

असे आहे मजूर तस्करीचे रॅकेट

अहमदनगर, औरंगाबाद येथील काही दलाल रेल्वे स्टेशन परिसरात लक्ष ठेवून असतात. कोणी घरातील कटकटीला वैतागुन आलेला असतो, तर कोणी कामधंद्याच्या शोधात असतो. अशा गरजवंत मजुरांना शोधयाचे आणि दिवसाला जेवणसह ६०० रुपये मजुरी ठरवायची आणि भुम तालुक्यातील दलाल त्यांना विकायचे. भुम येथील दलाल वरील गुत्तेदाराच्या ताब्यात या मजुरांना दयायचा. या बंदी मजुरांपैकी वाशिमचा एक मजूर पळून जाण्यात यशस्वी झाला. गावाकडे गेल्यानंतर त्याने झालेला अमानवी छळ सांगितला. नंतर मग उर्वरित मजुरांच्या सुटकेसाठी सूत्रे हालली. यात ढोकी पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *