अक्कलपाडातून पाणी सोडण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता; ३६ गावांना दिलासा

तालुक्यातील १५ गावे, शिंदखेडा तालुक्यातील पाच गावे तर, जळगावच्या अमळनेर तालुक्यातील १६ गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून २०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यास जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी बुधवारी मान्यता दिली. जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध जलाशयातून आरक्षित पाणी सोडण्यासाठी आढावा बैठक जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शर्मा यांनी पाणी सोडण्यास मान्यता दिली आहे.

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस. धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन. एम. व्हट्टे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश शेलार आदी उपस्थित होते. पांझरा नदीकाठावरील धुळे, शिंदखेडा, अमळनेर तालुक्यातील काही गावात टंचाई जाणवत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी,  जळगाव जिल्हाधिकारी यांनी अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातील पिण्यासाठी आरक्षित असलेले पाणी सोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली होती.

अक्कलपाडा मध्यम प्रकल्पातून पाणी सोडल्यामुळे अमळनेर तालुक्यातील पांझरा नदीकाठावरील १६ गावे, धुळे तालुक्यातील मौजे कुंडाणे, निमखेडी, जापी, शिरडाणे, न्याहळोद, धमाणे, अकलाड, कुसुंबा, मोराणे, भदाणे, नेर, कौठळ, तामसवाडी, हेंकळवाडी, मोहाडी ही १५ गावे तर, शिंदखेडा तालुक्यातील मौजे कंचनपूर, वालखेडा, अजंदे. बेटावद, पडावद अशी पाच गावे याप्रमाणे एकूण ३६ गावांची पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *