मुंबई: ३५०वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा उद्या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत असून, यानिमित्त राज्य शासनामार्फत शुक्रवारी रायगडावर मोठय़ा दिमाखात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता उद्घाटन समारंभ होणार असून, यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे प्रक्षेपण करण्यात येईल.

या सोहळय़ानिमित्ताने १ ते ६ जून या कालावधीत रायगड किल्ला परिसरात पाचाड येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २ जूनला होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री उदय सामंत, रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती उपस्थित राहणार आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळय़ासाठी प्रशासन सज्ज असून, अत्यावश्यक सेवा, सोयीसुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळय़ाला शिवभक्तांची प्रचंड गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने ३३ समित्या नियुक्त केल्या आहेत. नागरिकांना उन्हाचा त्रास होऊ नये, यासाठी राज सदर, होळीचा माळ, जगदीश्वर मंदिर आदी ठिकाणी आराम कक्ष आणि नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत. एसटी वाहन चालक, पोलीस, वैद्यकीय पथकांसाठीही मंडप उभारण्यात येत आहेत. शिवभक्तांच्या आरोग्याच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने अत्याधुनिक जीवरक्षक प्रणाली (अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट) सुविधा असणाऱ्या (पान ४ वर) (पान १ वरून) चार तर अन्य सुविधा असणाऱ्या १६ रुग्णवाहिका सज्ज ठेवल्या आहेत. वाहनतळाची जागा, गड पायथा आणि पायरीमार्गावर प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर आणि गडावर आरोग्य अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्स, आरोग्य सेवक, पुरेसा औषधसाठा यासह एकूण २४ वैद्यकीय पथकांच्या माध्यमातून १०४ डॉक्टर्स व ३५० आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र सज्ज ठेवण्यात आले आहेत.

सोहळय़ावर सीसीटीव्ही, ड्रोनचे लक्ष

सोहळय़ाला होणाऱ्या गर्दीच्या व्यवस्थापनासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, सार्वजनिक उद्घोषणा यंत्रणा, वॉकी टॉकी, पोर्टेबल साऊंड, सर्च लाईट, वीज अटकाव यंत्रणा आदी साधन-सामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे. सीसीटीव्ही, ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण सोहळय़ावर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधण्यासाठी नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार आहेत. पार्किंग, बस डेपो, गड पायथा, गडावरील सर्व मंडप, भोजन कक्ष अशा सर्व आवश्यक ठिकाणी एकूण चार अग्निशमन वाहने सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

गेटवे ऑफ इंडिया येथे ‘जाणता राजा’ महानाटय़

सांस्कृतिक कार्य विभाग आणि पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र यांच्या वतीने १ जून ते ७ जून या काळात गेटवे ऑफ इंडिया येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘जाणता राजा’ हे महानाटय़ १ जून रोजी, राजस्थानी लोककला २ जून रोजी, महाराष्ट्राची लोककला ३ व ४ जून रोजी तसेच ५ ते ७ जून दरम्यान गोवा व गुजरात या राज्यातील लोककलांचे सादरीकरण करण्यात येणार आहे. याबरोबरच १ ते ७ जून या कालावधीत शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे.

एसटीच्या १५० बसगाडय़ा

राज्यभरातून रायगड किल्ल्याकडे येणाऱ्या शिवभक्तांसाठी सोयीच्या ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. वाहने या ठिकाणी ठेवल्यानंतर शिवभक्तांची ने-आण करण्यासाठी वाहनतळ ते पाचाड नाका या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या मोफत १५० बसगाडय़ा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

किल्ले रायगडावर साजऱ्या होणाऱ्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग आणि वाकण-खोपोली मार्गावरील अवजड वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. बुधवारी मध्यरात्रीपासून २ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत, तर ४ जूनला रात्री १२ पासून ते ६ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत या दोन्ही मार्गावर अवजड वाहनांना बंदी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *