राज्यातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यभरातील शाळांमधून तब्बल 24 लाख 60 हजार विद्यार्थी बोगस ठरण्याची शक्यता आहे. शिक्षण विभागाकडून 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी संच मान्यतेची प्रक्रिया सुरु आहे. या प्रक्रियेत राज्यभरातील विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तपासले जात आहेत. आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 91 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तपासण्यात आले असून यातील 24 लाख 60 हजार विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरलेत.
त्यामुळे संच मान्यता प्रक्रियेतील नियमानुसार हे सर्व विद्यार्थी अतिरिक्त म्हणजेच बोगस विद्यार्थी ठरण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येनं विद्यार्थी बोगस ठरल्यास 60 हजार शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे. त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा फसवी असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं केलाय.
