वाडा तालुक्यातील ग्रामीण भागाची पाण्यासाठी सुरू असलेली वणवण संपण्याची चिन्हे नाहीत. ओगदा ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होते. टँकर देऊन सरकार स्वतःला कृतकृत्य समजते. मात्र अनियमित, तोकड्या पाणीपुरवठ्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरत नाही, हेच येथील वास्तव आहे. टोकरेपाडा, सागमाळ, घोडसाखरे व फणसगाव अशा अनेक गावपाड्यांची सध्या पाण्यासाठी फरफट सुरू असून महिलांना डोक्यावर तीन-तीन हंडे घेऊन दोन किलोमीटर अंतर पार करावे लागत आहे.
ओगदा ग्रामपंचायतीमधील टोकरेपाडा हे दुर्गम गाव आहे. वैतरणा धरणाजवळ असूनही येथील ग्रामस्थांचा जीव पाण्यासाठी तळमळतो. होळीपासूनच पाणीटंचाई सुरू झाली की, सरकार टँकरने पाणीपुरवठा सुरू करते. मात्र एक -दोन दिवसांआड येणारे पाणी अपुरे पडते, असे येथील महिला सांगतात. गावाचा चढाव उतरून महिला डोक्यावर हंडे घेउन दोन किलोमीटर प्रवास करतात. त्यांचा दिवसरात्र पाण्यासाठीच खर्च होतो. पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे लग्नसमारंभ, घरकामे तसेच किरकोळ गोष्टींसाठी लोकांना संघर्ष करावा लागतो.
‘दोन दिवसांतून एकदा टँकर येतो. तो काही मिनिटांत संपतो. डोक्यावरचा हंडा काही केल्या उतरायला तयार नाही. शारीरिक त्रास विसरून घशाची तहान भागवण्यासाठी महिलांना आटापिटा करावाच लागतो. पाणी हेच उद्दिष्ट बनल्याने रोजगाराकडे बघायला वेळच मिळत नाही,’ अशी व्यथा लता पारधी या स्थानिक महिलेने मांडली.
जलजीवन मिशन ही केंद्राची महत्त्वाकांक्षी योजना येथील भागाची पाणीटंचाई दूर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र थातूरमातूर कामे करून कंत्राटदार दिसेनासा झाल्याचे ग्रामस्थ संतापाने सांगतात. वैतरणा धरणाच्या पाणीसाठ्याजवळ विहीर खोदून टाकीतून विविध पाड्यांपर्यंत पाणी नेण्याचे प्रस्तावित आहे. मात्र वनविभागाच्या तांत्रिक अडचणींच्या कात्रीत ही योजना अडकल्याचे पाणीपुरवठा अभियंता सांगतात.
