तू मला आवडत नाहीस, निघून जा, दुसरं लग्न करायचंय; पतीचे बोचरे शब्द, पत्नीने आयुष्य संपवलं

 ‘तू मला आवडत नाहीस, घरी निघून जा, मला दुसरे लग्न करायचे आहे’ अशा शब्दात पतीने पत्नीला संसारातून दूर होण्याचा इशारा दिला. आयुष्याच्या जोडीदाराच्या तोंडून निघालेले हे शब्द विवाहितेच्या जिव्हारी लागले. दुखावलेल्या मनस्थितीतच तिने गळफास घेऊन स्वतःचं आयुष्य संपवलं. ही घटना संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या जांबरगाव येथे मंगळवारी रात्री घडली.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निकिता माळी (वय २१ वर्ष, राहणार जांबरगाव तालुका वैजापूर) असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. निकिता हिचा काही वर्षांपूर्वी वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील लखन याच्याशी विवाह झाला होता. नातेवाईकांच्या साक्षीने झालेल्या विवाह सोहळ्यानंतर आपलं आयुष्य सुखी समृद्धी होईल, अशी अपेक्षा निकिता हिला विवाहानंतर होती. मात्र पती लखनच्या मनात काहीतरी वेगळंच सुरू होतं.

लग्नाच्या नंतर निकिताला पती लखन याने शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. असं असलं तरी संसार टिकवण्यासाठी तिने सर्व काही सहन केलं. ‘तू मला आवडत नाहीस, घरी निघून जा, मला दुसरे लग्न करायचे आहे’ असे म्हणून लखन निकिताला वारंवार त्रास देत होता. या त्रासाला कंटाळुन निकिता हिने रात्री घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच निकिता हिच्या माहेरच्या मंडळींनी धाव घेतली. दरम्यान ही घटना पतीच्या त्रासाला कंटाळून घडली असल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान या प्रकरणी निकिता हिचे वडील इंदास सोनवणे (रा. खरंज) यांनी दिलेल्या तक्रारीवरून निकिताचा पती लखन याच्या विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *