भरधाव कार ट्रॅव्हल्सला धडकली, एअर बॅग उघडली पण…; कुटुंबातील ४ जण जागीच ठार

राज्यात रस्ते अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता सांगलीमध्येही एक भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांगलीच्या विटानजीक खाजगी ट्रॅव्हल्स आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. यामध्ये ४ जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मृत चौघेही एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटा येथील सातारा रोडवर शिवाजीनगर इथे हा भीषण अपघात घडला आहे. मृत तासगाव तालुक्यातल्या गव्हाण येथील असून मृतांमध्ये एक महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. गव्हाण येथील काशीद कुटुंब हे साताराहून विटाकडे येत होतं. तर विट्याहून महाबळेश्वर राज्य मार्गावरून साताऱ्याकडे खाजगी ट्रॅव्हल्स निघाली असता शिवाजीनगर या ठिकाणी उतारीवर दोन्ही वाहनांची समोरासमोर भीषण धडक झाली.

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चारचाकी गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. ज्यामध्ये गाडीत असणारे चौघेजण जागीच ठार झाले. तर गाडीत असणारी एअर बॅग वेळीच उघडल्याने गाडीतील एक व्यक्ती बचावला आहे. या अपघातानंतर विटा-सातारा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. सकाळी ७ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला आहे. घटनेनंतर विटा पोलिसांनी धाव घेऊन पंचनामा केला. तर या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यामध्ये झाली असून अधिक तपास विटा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *