मुंबईहून पुणे, नाशिकला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज! घाटात नो ब्रेक, रेल्वेगाड्यांचा वाढणार वेग

सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर करून कसारा आणि कर्जत घाटमार्गावरून विनाथांबा रेल्वे वाहतूक करण्यात येणार आहे. घाटातील रेल्वे रुळांवर ३० किमी प्रतितास या वेगमर्यादेचे ‘स्पीड सेंसिंग डिव्हाइस'(एसएसडी) कार्यान्वित करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे घाटातील रेल्वे वाहतुकीच्या एकूण क्षमतेत ३० टक्क्यांनी वाढ होणार आहे.

सध्या कर्जत आणि कसारा घाटमार्गावरून मुंबईकडे येणाऱ्या रेल्वेगाड्या तीन अतितीव्र उताराच्या ठिकाणी थांबवण्यात येतात. या ठिकाणी गाड्यांच्या ब्रेकची तपासणी केली जाते. यानंतर पुन्हा गाड्या मुंबईकडे रवाना केल्या जातात. वेग कमी करणे, गाडी थांबणे, सुरू झाल्यानंतर अपेक्षित वेगमर्यादेपर्यंत पोहोचणे यांमुळे ही प्रक्रिया वेळखाऊ ठरत आहे.

रेल्वे रुळांवर एसएसडी कार्यान्वित केल्यानंतर घाटात रेल्वेगाड्या थांबवण्याची गरज भासणार नाही. रुळांवरील सेन्सरमुळे गाड्यांचा वेग ३० किमी प्रतितासापेक्षा जास्त झाल्यास स्वयंचलित पद्धतीने सिग्नल लाल होतो. एसएसडी तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यावर घाटातून विनाथांबा रेल्वे वाहतूक शक्य आहे.

घाटमार्ग – मेल-एक्सप्रेस – मालगाडी – इंजिन – एकूण

कसारा – ४७ – ४७ – ९ – १०३

कर्जत – ४१ – ४१ – १३ – ९५

घाटमार्गात ‘एसएसडी’ नसल्याने गाडी थांबल्यावर तपासणी, पुन्हा सुरू होऊन अपेक्षित वेग प्राप्त होण्यासाठी सरासरी २ ते ३ मिनिटांचा वेळ लागतो. यामुळे घाटात रोज सुमारे १३ ते १४ तासांचा वेळ वाया जातो.

 तीव्र उतार असलेल्या घाटमार्गावरील रेल्वेगाड्यांवर स्वयंचलित पद्धतीने नियंत्रण ठेवण्याचे काम ‘एसएसडी’करते.

– रेल्वे रुळांवर सेन्सर कार्यान्वित करून त्याची जोडणी सिग्नलला देण्यात येते.

– सेंसरमध्ये आवश्यकतेनुसार वेगमर्यादा निश्चित करण्यात येते.

– एसएसडीवरून कार्यान्वित रुळांवरून रेल्वे गेल्यास त्याच्या वेगाची नोंद केली जाते.

– वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास सेन्सरच्या माध्यमाने सिग्नल लाल होतो आणि गाडी थांबवण्यात येते.

३० टक्यांनी क्षमता वाढणार

घाटमार्गावरील प्रत्येक गाडीमागे २ मिनिटांची बचत झाल्यास घाटातील एकूण रेल्वेगाडीच्या वेळापत्रकात १३ ते १४ तासांपेक्षा जास्त वेळ वाचवणे शक्य होणार आहे. यामुळे घाटात रेल्वेवाहतूक करण्याच्या क्षमतेत २५ ते ३० टक्क्यांनी वाढ करणे शक्य होणार आहे.

कर्जत आणि कसारा घाटमार्गावर एसएसडी तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठीचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे. पावसाळा संपण्याच्या आत हे काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *