मुसळधार पावसामुळे पूर; यवतमाळ-दारव्हा वाहतूक बंद

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे दारव्हा तालुक्यातील अडाण नदी दुथडी भरून वाहत आहे. बोरी अरब येथे पुलावर पुराचे पाणी असल्याने यवतमाळ-दारव्हा मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचे थैमान सुरू आहे. या पावसामुळे आतापर्यंत दीडशेहून अधिक घरांची पडझड झाली तर एक व्यक्तीचा आणि चार जनावरांचा वीज पडून मृत्यू झाला. उन्हाळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सकाळी उन्हाचे चटके बसत असताना दुपारपासून पुन्हा पावसाळी वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस कोसळला. रात्री या पावसाने चांगलाच जोर पकडला. त्यामुळे अनेक नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. शहरातील गटार, नाल्यांची सफाई न झाल्यामुळे घाण पाणी रस्त्यावर आल्याने अनेक रस्तेही पाण्याखाली गेले. आज बुधवारी सकाळपासून पावसाची रिपरिप सुरू असून पावसाची झड लागल्याचे चित्र आहे.

वाहतूक ३४ दिवस बंद

बोरी अरब (ता. दारव्हा) येथे राज्यमार्गावर अडाण नदीवरील पुलाचे बांधकाम तब्ब्ल दोन वर्षांपासून सुरू आहे. मागील वर्षी पावसाळ्यात दारव्हा-यवतमाळ वाहतूक तब्बल ३४ दिवस बंद होती. या वर्षी बांधकाम पूर्ण होऊन वाहतूक सुरू होईल ही अपेक्षा होती. मात्र सध्या स्थितीत बांधकाम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने पुलाचे बांधकाम होणार नाही असेच दिसते. या नदीवरील पुलाचे बांधकाम करताना बाजूला तात्पुरता पूल बांधला आहे. हा पूल खूप लहान आहे. थोडा पाऊस आला की पुलावरून पाणी वाहते आणि वाहतूक बंद पडते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *