आणखी तीन मृतदेह हाती; भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा पोहोचला ८वर

भिवंडीच्या वळगावातील वर्धमान कंपाऊंडमधील दुर्घटनाग्रस्त तीन मजली इमारतीच्या ठिगाऱ्यातून बचाव पथकांनी रविवारी आणखी तिघांचे मृतदेह बाहेर काढले. त्यामुळे या घटनेतील एकूण मृतांची संख्या आठ झाली आहे. दुसरीकडे २० तासानंतर एका तरुणाला सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकांना यश आले. सुनील पिसाळ असे त्याचे नाव असून, या दुर्घटनेतून बचावलेल्यांची संख्या १० झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत हे बचावकार्य सुरू होते.

तळ आणि पहिल्या मजल्यावर मे. एम.आर.के. फुड्सचे गोदाम आणि कार्यालय होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर घरे होती. या घरांमध्ये काही कुटुंबे भाड्याने राहत होती. त्यामुळे इमारत कोसळ्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. शनिवारी दुपारपासून राष्ट्रीय आपत्तीप्रतिसाद दल, ठाणे आपत्तीप्रतिसाद दल, भिवंडी महापालिकेचे अग्निशमन दल, ठाणे शहर आणि ग्रामीण पोलिसांची पथके ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेत होते. रात्री पथकाने नवनाथ सावंत (४०), लक्ष्मीदेवी म्हातो (२६) आणि सोना कोरी (४ वर्षे ६ महिने) यांचे मृतदेह ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते, तर नऊ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले होते. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असल्याने बचाव पथकांकडून शोधकार्य सुरूच होते. तब्बल २० तासांनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या पिसाळ यांना बाहेर काढण्यात पथकांना यश आले. त्यानंतर सुधाकर गवई (३४), प्रवीण चौधरी (२२) आणि त्रिवेणी यादव (४०) यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

वाढदिवसाच्या दिवशी पुनर्जन्म

ढिगाऱ्याखालून २० तासानंतर जिवंत बाहेर काढण्यात आलेल्या पिसाळ यांचा रविवारी वाढदिवस होता. ढिगाऱ्याखालून बाहेर येताच त्यांना अश्रू अनावर झाले. ढिगाऱ्याखाली असताना जगण्यासाठी धरपडत होतो. परंतु नातेवाईक आणि मित्रांच्या आशीर्वादामुळे जगलो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. तसेच हात जोडून बचाव पथकांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *