गोड हापूस सर्वसामान्यांसाठी आंबटच; डझनसाठी मोजावे लागताहेत इतके रुपये

बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने यावर्षी शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अजूनही काही भागात पावसाचा आणि गारपिटीचा त्रास होत आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये कोकणात आलेल्या पावसामुळे आंब्याचा मोहर गळून गेला होता. परिणामी एप्रिलमध्ये बाजारात येणारा हापूस आंबा, झाडावरच गळून गेला होता. काही ठिकाणी तर झाडावरचा मोहर आलेल्या स्थितीतच गळाला होता. त्यामुळे एप्रिलमध्ये येणारा हापूस आंबा फारच कमी प्रमाणात बाजारात आला आहे.सद्यस्थितीत बाजारात कोकणी हापूसची आवक घसरली आहे. सध्या वाशीच्या घाऊक फळ बाजारात कोकणातून हापूसच्या सरासरी १७ ते १८ हजार पेट्या येत आहेत. हंगामातच हापूसची आवक २० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे हापूसचे दर चढेच असून, अस्सल कोकणी हापूसच्या एका डझनासाठी बाजारात आत्ता एक हजार ते बाराशे रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे ऐन हंगामातच हापूस आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे.

आपल्या अवीट गोडीमुळे हापूस सर्व फळांचा राजा आहे. आता तर दरामुळेही हापूसच बाजारात राजा झाला आहे. एप्रिल आणि मे हा हापूस आंब्याचा मुख्य हंगाम आहे. मात्र, या मुख्य हंगामातच हापूस आंब्याची कमतरता जाणवत आहे. नेहमी एप्रिलच्या दरम्यान बाजारात हापूस आंब्याच्या ८० ते ९० हजार, तर कधी कधी एक लाख पेट्यांचीही आवक झालेली आहे. या हंगामात हापूस आंबा सर्वाधिक बाजारात येत असल्याने हापूस आंब्याचे दरही कमी होतात. साधारण २०० ते ३०० रुपये डझनपर्यंत हे दर खाली येतात. यंदा मात्र हापूस आंब्याचे दर चक्क हजार ते १२०० रुपये डझन असे आहेत. एप्रिलमध्ये हापूस आंब्याचे दर कमी होतात म्हणून सर्वसामान्य नागरिक एप्रिल मे महिन्याची वाट पाहत असतात. याच महिन्यात सर्वाधिक सर्वसामान्य आंब्याची गोडी चाखतात. मात्र, यावेळचे चित्र अगदी उलट आहे.

दरम्यान, ५ ते १० मेपर्यंत बाजारात हीच स्थिती राहणार आहे. त्यानंतर कोकणातून हापूस आंब्याची आवक वाढण्याची शक्यता काही व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. ती आवक वाढल्यावर हे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे.

कर्नाटकी आंब्याची हापूसच्या नावाने विक्री

हापूसची आवक कमी असल्याने अनेक व्यापारी कर्नाटक आणि इतर ठिकाणाहून येणारा आंबा हापूसच्या नावाने विकून नफा मिळवत आहेत. काही व्यापारी आंब्याचे दर १२०० ते हजार रुपये सांगतात आणि मग अगदी ४०० रुपये डझनाने आंबे ग्राहकांना विकत आहेत. यामुळे ग्राहकही खुश होत आहेत. मात्र, आंब्यांची चव चाखताना हे अस्सल हापूस नसून, कर्नाटकी आंबे असल्याचा अनुभव ग्राहकांना येत आहेत. हे आंबे घाऊक बाजारात १५० ते १७० रुपये किलोने विकले जात आहेत. त्यामुळे हापूसच्या नावाने ग्राहकांची फसवणूक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *