ठाण्यातील बेकायदा भाजी बाजारासह फेरिवाल्यांवर पालिकेची कारवाई; जप्त केलेले फळ, भाजीपाल्याचे सेवाभावी संस्थांना वाटप

येथील जांभळीनाका भागातील फळ-भाजी मंडईतील व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर जाग आलेल्या ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्या आठवड्यापासून परिसरातील बेकायदा फेरिवाल्यांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईत जप्त करण्यात आलेला फळे व भाजीपाला सेवाभावी संस्थांना वाटप करण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी स्पष्ट केले आहे.

ठाणे येथील जांभळीनाका परिसरात मोठी भाजी मंडई आहे. याठिकाणी शिवाजी मैदान भाजी विक्रेता सेवा संघ आणि जिजामाता फळ-भाजी विक्रेता सेवा संघ अशा दोन व्यापारी संघटना आहेत. या संघटनांनी अनधिकृत भाजी विक्रेत्यांवर कारवाईची मागणी करत बेमुदत बंद पुकारला होता. पाच दिवसानंतर पालिका प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांनंतर व्यापाऱ्यांनी पुकारलेला बंद मागे घेतला होता. व्यापाऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार पालिका प्रशासनाने येथील बेकायदा फेरिवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. गेला आठवडाभर सकाळी ६.३० वाजल्यापासून ही कारवाई करण्यात येत आहे. त्यात सुभाष पथ येथील मुख्य रस्त्यावर असलेल्या अनधिकृत भाजी बाजारावर कारवाई करण्यात येत आहे. यात फळे आणि भाजीपाला जप्त करण्यात आला आहे. हा फळ-भाजीपाला सेवाभावी संस्थांना वाटप करण्यात आला. त्यात छत्रपती शिवाजी कळवा रुग्णालय येथील शिव प्रेरणा मंडळ, वर्तक नगर येथील दिव्यप्रभा महिला अनाथालय, माँ निकेतन महिला कामगार संस्था, नौपाडा येथील वुमेन्स वेल्फेअर फाऊंडेशन, नौपाडा कोपरी प्रभागातील बेघर संस्था, येउर येथील श्री सदगुरू सेवा मंदिर ट्रस्ट या सेवाभावी संस्थांचा समावेश आहे.

 बेकायदा भाजी बाजारामुळे येथून जाणाऱ्या परिवहनच्या बसेसनाही अडथळा निर्माण होत होता, या भाजी बाजारावर करण्यात आलेल्या कारवाईमुळे येथे होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मदत झाली आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर ते टॉवर चौक, गणपती मंदिर ते विठ्ठल मंदिर, पोलीस चौकी नं.२ समोरील रस्ता तसेच ए-१ फर्निचर ते अग्निशमन कार्यालयपर्यंतच्या रस्त्यावरील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अजय एडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाचे कर्मचारी करीत आहेत.

ठाणे स्थानक आणि परिसरालगत असलेले सर्व रस्ते, पदपथ हे वाहतुकीसाठी कायमस्वरुपी मोकळे असणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून वारंवार जनजागृती करूनही अतिक्रमण होत आहे. त्यामुळे याठिकाणी पालिका पथक पोलिसांच्या मदतीने कारवाई करीत आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करून नागरिकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होईल असे कृत्य करू नये, तसेच रस्ता वा पदपथावर बसत असलेल्या फेरीवाल्यांवर नागरिकांकडून खरेदी करू नये असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी नागरिकांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *