शेतकऱ्यांवर पुन्हा अस्मानी संकट; मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता, पुढील पाच दिवस महत्त्वाचे

कधी उष्णतेच्या लाटेचा इशारा तर कधी अवकाळी पावसाचा अंदाज राज्यात गेल्या काही महिन्यांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. या बदलाचा फटका पिकांवर तर होतोच आहे त्याचबरोबर आरोग्यावर होत आहे. आत्तापर्यंत उन्हाच्या काहिलीने हैराण होणाऱ्या नागरिकांना आता पावसाचा तडाखा सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात पुढील पाच दिवस तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

शनिवारी विदर्भातील अकोला, चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसामुळं शेतीचं नुकसान झालं. तर, वीज कोसळून काही जणांचा मृत्यू झाला. आशातच आता पुन्हा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील पाच दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात शुक्रवार म्हणजेच २६ एप्रिल आणि २७ एप्रिलला पावसाची तीव्रता अधिक असेल. तर, विदर्भात पूर्ण पाच दिवस अवकाळी पावसाची तीव्रता असेल तसंच, गारपीट होण्याचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

विदर्भ, मराठवाड्यात पाऊस झाल्याने राज्यात उष्णतेचा पारा काहिसा घसरला आहे. पुढील पाच दिवस तापमान दोन अंश सेल्सिअसने कमी होणार आहे. तर, पुढील पाच दिवस राज्यात कोणत्याही उष्णतेच्या लाटेची शक्यता नसेल, असंही हवामान विभागाने स्पष्ट केलं आहे. विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, आणि वाशिम जिल्ह्यातही अलर्ट देण्यात आला आहे.

विदर्भ व मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, गारपिटीची शक्यता असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकाची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने तसं ट्विट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *