पंजाबमध्ये असणाऱ्या भटिंडा आर्मी कँप येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळं एकच खळबळ माजली आहे. गोळीबाराच्या या घटनेमध्ये लष्कराच्या 4 जवानांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान गोळीबार नेमका कोणी केला याचा शोध अद्यापही सुरु आहे.
गोळीबाराची माहिती मिळताच शहराला लागून असणाऱ्या या परिसरात लगेचच सीमा बंद करत शोधमोहिम हाती घेण्यात आली. हा देशातील एक सर्वात जुना आणि मोठा लकष्करी तळ असून, शहरापासून काही अंतरावरच तो स्थिरावला आहे. किंबहुना शहराच्या सीमा विस्तारल्यामुळं हे अंतरही गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालं आहे. त्यामुळं परिस्थितीचं गांभीर्य पाहता सध्या या भागात चोख बंदोबस्त पाहायला मिळत असून, प्रत्येक लहानमोठ्या हालचालीवर सुरक्षा यंत्रणांचं लक्ष आहे.
भटिंडा येथील आर्मी कँपनजीक असणारा शहरी भाग पाहता इथं कोणत्याही सर्वसामान्य वाहनातून लष्करी तळापासून अगदी सहजपणे बाहेर जाता येऊ शकतं ज्यामुळं इथं सध्या सुरक्षेचा चोख बंदोबस्त करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार गोळीबाराची ही घटना ऑफिसर्स मेसमध्ये झाली. पहाटे साधारण 4 वाजून 35 मिनिटांनी झालेल्या या घटनेची वेळ पाहता ही अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादातून घडलेली घटना असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत होता.
सदर घटनेनंतर घटनास्थळी QRT पथक दाखल झालं आणि त्यांनी पुढील मोर्चा सांभाळला. दरम्यान, हल्लेखोर सैन्याच्या पोषाखात नसल्याची माहिती समोर आली असून, ज्या चौघंचा या घटनेमध्ये मृत्या झाला आहे ते 80 मीडियम रेजिमेंटचे जवान असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी हा दहशतवादी हल्ला नसल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी युनिट गार्डच्या कक्षातून एक इनसास एसॉल्ट रायफल नाहीशी झाली होती, हा हल्ला त्याच रायफलनं केल्याचा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जात आहे.
