टायर जाळायला गेले अन् पोलिस चौकीच पेटवून बसले; मद्यपींचा पहाटेचा प्रताप

 बिटको चौकातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर उड्डाणपुलाखाली असलेली वाहतूक पोलिसांची चौकी पुलाखालील गर्दुल्ले आणि मद्यपींनी लावलेल्या आगीत भस्मसात झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२३) पहाटे सव्वापाचला घडली. या घटनेमुळे शहरातील पोलिस चौक्यांचीच सुरक्षा ऐरणीवर आल्याची बाबदेखील उघड झाली आहे.

सिंहस्थपर्व काळात वापरण्यात आलेल्या पोलिस चौक्या सिंहस्थानंतर शहरातील विविध चौकांत वाहतूक पोलिसांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या पोलिस चौक्यांतूनच वाहतूक शाखेचे कर्मचारी आपल्या कर्तव्याचा गाडा हाकत होते. त्यातीलच एक पोलिस चौकी नाशिकरोड येथील अत्यंत वर्दळीच्या अशा बिटको चौकात ठेवण्यात आली होती.बिटको चौकातील वाहतूक शाखेच्या पोलिस चौकीच्या मागील बाजूस मोठ्या संख्येने गर्दुल्ले, मद्यपी, निराधार कुटुंबे वास्तव्य करतात. त्यांच्याकडून खाद्यपदार्थ, कचरा या पोलिस चौकीजवळच आणि चौकीखाली टाकला जातो. काही गर्दुल्ल्यांनी गुरुवारी रात्री टायर पेटविले. या पेटलेल्या टायरची आग पोलिस चौकीखालील कचऱ्याला लागल्याने काही क्षणात चौकीने पेट घेतला. पोलिस चौकी आगीच्या ज्वाळांत वेढल्याचे पाहून गर्दुल्ले, मद्यपी, निराधार कुटुंबांनी तेथून धूम ठोकली. पोलिस चौकी पेटल्याची बाब जवळच असलेले पानटपरी चालक सलीम शेख यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ अग्निशामक दलाला या आगीची माहिती दिली. महापालिकेच्या अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत चौकी पूर्णपणे खाक झाली होती.

बिटको चौकातील पोलिस चौकी गुरुवारी पहाटे गर्दुल्ल्यांनी लावलेल्या आगीत खाक झाली. पंचनामा करून पोलिस दप्तरी आकस्मिक जळिताची नोंद केली.
– अनिल शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नाशिकरोड पोलिस ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *