मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे-डोंबिवली प्रवास केवळ २० मिनिटांत पूर्ण करणे शक्य व्हावे यासाठी हाती घेतलेल्या मोटागाव-माणकोली खाडी पूल आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाले आहे. आता या प्रकल्पाला वेग देऊन उर्वरित कामे पूर्ण करून मे २०२३ पर्यंत हा पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे.
ठाण्यावरून डोंबिवली जाण्यासाठी प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. मुंबई-नाशिक महामार्गावरून डोंबिवलीच्या दिशेने जाण्यासाठी कल्याणवरून जावे लागते. तर इतर पर्यायही वेळखाऊ आहेत. ही बाब लक्षात घेता एमएमआरडीएने उल्हास खाडीवर सहा पदरी माणकोली पूल आणि जोडरस्ता बांधण्याचा निर्णय घेतला. माणकोली- मोटागाव जोडरस्ता १.३ किमी लांबीचा आहे. गेल्या काही वर्षांपासून एमएमआरडीए या प्रकल्पाचे काम करीत असून महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी मंगळवारी या प्रकल्पाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला.
आजवर पुलाचे आणि जोडरस्त्याचे ८४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. तसेच आता उर्वरित कामाला वेग देऊन मे २०२३ मध्ये काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. काम पूर्ण झाल्यानंतर तात्काळ पूल आणि जोडरस्ता वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
