दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! राज्य मंडळाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावाच्या परीक्षा होणार आहेत. 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान बारावीची परीक्षा होणार आहे तर दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाने (State Board) यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यावेळी दहावी आणि बारावीच्या परीक्षांदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य मंडळातर्फे कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याकडून 20 जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने कृती कार्यक्रमासाठी सूचना मागवण्यात आल्या आहेत.

कृती कार्यक्रम कशासाठी?

शिक्षण मंडळाकडून लोकसहभागातून पहिल्यांदाच अशा प्रकारचा कृती कार्यक्रम तयार करण्यात येत आहे.  दहावी आणि बारावीच्या परीक्षेवेळी विद्यार्थ्यांकडून होणारे गैरप्रकार रोखणे राज्य मंडळासाठी आव्हानात्मक असते. मात्र, हे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाच्या मार्गदर्शनाखाली नऊ विभागीय केंद्रे आपापल्या स्तरावर उपाययोजना आणि उपक्रम राबवत असतात. या प्रयत्नांमध्ये एकसूत्रता आणण्याची सातत्याने गरज जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाने कृती कार्यक्रम तयार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून कृती कार्यक्रम मागवण्यात आला आहे. या कृती कार्यक्रमांचे तज्ज्ञ समितीमार्फत परीक्षण करुन दहा कृती कार्यक्रमांची निवड करण्यात येणार आहे. तसेच संबंधित कृती कार्यक्रम पाठवणाऱ्यांचा गौरव देखील करण्यात येणार आहे.

 पूर्ण वेळ शाळेत असणार भरारी पथके

दुसरीकडे राज्य मंडळाने दोन्ही परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत.
दहावी- बारावी परीक्षेत यंदा बैठी पथके विशिष्ट शाळेत पूर्णवेळ नियुक्त करण्यात येणार आहेत. कॉपीसारखे गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पेपरदरम्यान हे बैठे पथक शाळेतच उपस्थित असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *