एकतर्फी प्रेमाच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. पण आता शालेय विद्यार्थ्यांमध्येही याचे परिणाम दिसू लागले आहेत. आठवीतल्या एका विद्यार्थ्याने सहावीतल्या विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिच्या भांगेत सिंदूर भरला. घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी 16 वर्षांच्या मुलाला अटक केली आहे.
काय आहे नेमकी घटना
उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) महाराजगंजमधली ही धक्कादायक घटना आहे. आठवीत शिकणारा विद्यार्थी सहावीत शिकणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता. गेल्या तीन महिन्यांपासून हा मुलगा त्या मुलीच्या मागे लागला होता. त्याच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीच्या वडिलांनी मुलीची शाळाही बदलली होती. पण यानंतर मुलाने तिचा पिछा सोडला नव्हता.
शनिवारी संध्याकाळच्या सुमारास मुलगा आपल्या मित्राबरोबर 14 वर्षीय मुलीच्या घरी पोहोचला. मुलगी घरी काम करत होती, यावेळी अचानक घरात घुसलेल्या मुलाने मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिच्या भांगेत सिंदूर भरला. अचानक घडलेल्या या घटनेने मुलगी घाबरली आणि तीने आरडाओरडा सुरु केला. घरचे तिथे पोहचण्याआधीच मलुाने तितून पळ काढला. यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलीला धमकी देणं, विनयभंग करणं Offences Act– POCSO या गुन्ह्याअंतर्गत मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं. आरोपी मुलगा दुचाकीवरुन मुलीच्या घराजवळ आला, त्यानंतर त्याने घराच्या भिंतीवरुन उडी मारत घरात प्रवेश केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मुलाची ओळख पटवण्यात आली आणि त्याला अटक करण्यात आली. मुलाला बाल सुधार गृहात पाठवण्यात आलं आहे.
‘मी तुझ्यावर प्रेम करतो’
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मुलगा हा पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम करत होता आणि तिच्याशी त्याला लग्न करायचं होतं. याआधीही त्याने मुलीला अनेकवेळा त्रास दिला होता, पण समाजात बदनामी होईल या भीतीने तिच्या वडिलांनी पोलिसात तक्रार केली नव्हती. यानंतर मुलीला दुसऱ्या शाळेत पाठवण्यात आलं होतं.
