खासगी कंपनीच्या स्पर्धेवर महावितरणला मात करणे शक्य ; प्रताप होगाडे यांचे मत

महावितरण कंपनीचे जाळे मोठे, भक्कम आहे. त्यांनी पारदर्शक कारभार करून आणि क्षमतांचा पूर्ण वापर करून प्रामाणिक कारभार केला तर कोणत्याही खासगी कंपनीच्या स्पर्धेवर मात करता येणे शक्य आहे, असे मत महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष, वीज तज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी व्यक्त केले.

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी अदानी कंपनीच्या ज्सगीकरणाच्या निर्णयाविरोधात तीन दिवस संप करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर होगाडे म्हणाले, साडेतीन कोटी सर्वसामान्य ग्राहकांचा सहभाग असलेली महावितरण कंपनी टिकावी अशा सर्वाच्या भावना आहेत. दुर्दैवाने यामध्ये खासगीकरणाचा अडसर महावितरण समोर आहे. वास्तविक, वीज कायदा २००३ नुसार खासगीकरणाला परवाना देण्यात आला आहे. टाटा वीज कंपनीने तो मिळवला असल्याने रिलायन्सचे ग्राहक तिकडे वर्ग होताना दिसत आहेत.

महावितरणचे प्रश्न संपामुळे मिटणारे नाहीत. परिणामी आताच्या आंदोलनाला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नाही. गेल्या २२ वर्षांतील महावितरणच्या कामाचा अनुभव हा निराशाजनक आहे. ग्राहकाला जणू शत्रू असल्याप्रमाणे वागणूक दिली जाते. देशात सर्वाधिक वीजदर महावितरणचे असताना पुन्हा दीडपट वाढीचा प्रस्ताव दिला आहे. प्रामाणिक कारभार करून दाखवला तर कोणत्याही खासगी कंपनीचे आव्हान महावितरणला सहज पेलता येईल. तशी कार्यक्षमता संचालक, अधिकारी, कर्मचारी यांनी दाखवणे गरजेचे आहे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *