ठाण्यातील मुख्य मार्ग चकाचक पण, इतर मार्गांवर अस्वच्छता; रस्त्यालगत राडारोड्याचे ढिगारे

ठाणे शहरातील आनंदनगर ते माजिवाडा या मुख्य मार्गावर सुशोभिकरणाबरोबरच राडारोडा उचलण्यात येत असल्याने हा परिसर गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ दिसत असतानाच, दुसरीकडे शहरातील इतर काही प्रमुख मार्गांवर मात्र अस्वच्छता असल्याचे चित्र आहे. बाळकुम ते कशेळी आणि माजिवाडा ते खारेगाव या मार्गालगत राडारोड्याचे ढिगारे दिसून येत असून त्याचबरोबर याठिकाणी राड्यारोड्याच्या मातीमुळे धुळ प्रदुषणही असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहराचा दर्शनीय परिसर स्वच्छ आणि सुशोभित करण्यात व्यस्त असलेल्या महापालिका प्रशासनाचे शहरातील इतर रस्त्यांवरील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शहर सौंदर्यीकरणाची संकल्पना ठाणे शहरात राबविण्यात येत असून त्यासाठी राज्य शासनाने पालिकेला निधीही उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात आनंदनगर नाका ते माजिवडा जंक्शन पर्यंतच्या रस्ता दुभाजक विविध रंगसंगतीमध्ये रंगवले जात आहेत. याशिवाय, कोपरी तसेच इतर भागांमध्येही अशाचप्रकारची कामे सुरु आहेत. या कामाचा ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर हे दर आठवड्याला आढावा घेत असून त्याचबरोबर कामाच्या ठिकाणी जाऊन कामाच्या गुणवत्तेची पाहाणी करीत आहेत. अशाचप्रकारे काही दिवसांपुर्वी केलेल्या दौऱ्यादरम्यान आयुक्त बांगर यांना ठिकठिकाणी राडारोडा, मातीचे ढिगारे पडलेले असल्याचे दिसून आले. तसेच महामार्गावरील सर्वच पुलांवर माती साठून त्या धुळीचा नागरिकांना त्रास होत असल्याचेही त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी दिलेल्या आदेशानंतर घनकचरा विभागाने सफाई कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या टीम तयार करून पुलांवरील माती हटविण्यास सुरुवात केली. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा संपुर्ण परिसर स्वच्छ असल्याचे दिसून येत आहे.

शहरातील आनंदनगर ते माजिवाडा या मुख्य मार्गावर स्वच्छता दिसून येत असली तरी शहरातील इतर काही प्रमुख मार्गांवर मात्र अस्वच्छता असल्याचे चित्र आहे. ठाणे-भिवंडी वाहतूकीसाठी बाळकुम ते कशेळी आणि मुंबई-नाशिक मार्गावरील माजिवाडा ते खारेगाव हे मार्ग महत्वाचे मानले जातात. या मार्गांवरून अवजड तसेच हलक्या वाहनांची सतत वाहतूक सुरु असते. या मार्गाच्या दोन्ही बाजुला राडारोड्याचे ढिग दिसून येत आहेत. राडारोड्याची माती रस्त्यावर इतरत्र पसरत असून वाहनांच्या वर्दळीमुळे ही माती उडून धुळ प्रदुषण होत आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असून अनेकजण मुखपट्टीचा वापर करीत आहेत. याठिकाणी कुठेही सुशोभिकरणाची कामे सुरु नाहीत. या रस्त्यांवरील अस्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांची प्रतिक्रीया मिळू शकली नाही.

ठाणे शहरातील मुख्य रस्त्यांवर राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढल्याने शहराच्या सौंदर्यीकरणास बाधा येत असून त्यामुळे राडारोडा टाकणाऱ्यांवर वचक बसण्यासाठी दक्षता पथक नेमण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नुकतेच दिले आहेत. तसेच राडारोडा टाकणाऱ्यांचा शोध घेवून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. असे असतानाही बाळकुम ते कशेळी आणि माजिवाडा ते खारेगाव या मार्गालगत राडारोडा टाकण्याचे प्रकार सुरु असल्याचे दिसून येते असून त्याकडेही पालिकेचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *