सात तासाच्या अथक प्रयत्नानंतरही बिबट्याचा वनाधिकाऱ्यांना गुंगारा

सकाळी साडे आठ वाजल्यापासून बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे विशेष पथक प्रयत्न करत आहे. परंतु श्रीराम अनुग्रह सोसायटीच्या जिन्यांमध्ये बिबट्या सतत वर खाली करत असल्याने त्याला पकडण्यात अधिकाऱ्यांना यश येत नाही. सकाळी साडे आठ वाजल्यापासून बिबट्याला पकडण्यासाठी जोरदार प्रयत्न वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळी दोन वेळा बिबट्या खिडकी आणि सज्ज्यातून पळत असताना नागरिकांना दिसला. वन विभागाने श्रीराम अनुग्रह सोसायटीचे मुख्य प्रवेशव्दार बंद करुन बिबट्या पळून जाणार नाही याची विशेष खबरदारी घेतली आहे. सोसायटीतील रहिवाशांना दरवाजे, खिडक्या बंद करुन घरातच बसण्यास सांगितले आहे.बिबट्या सोसायटीत आला आहे याची माहिती नसल्याने घराच्या बाहेर पडताच बिबट्याने सोसायटीतील तीन जणांवर हल्ला केला आहे. यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

अग्निशमन जवान, पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी परिसरात तैनात करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर बिबट्याला सहज पकडणे शक्य नसल्याने बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विशेष पकड पथक कल्याणला बोलविण्यात आले आहे. हे पथक आल्यानंतर बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात येईल, असे एका वनाधिकाऱ्याने सांगितले. वनाधिकाऱ्यांनी बिबट्याला जिन्याच्या एका कोपऱ्यात अडकून ठेवण्यात यश मिळविले आहे. इमारतीत शिरुन पिंजरा लावून बिबट्याला पकडणे शक्य नाही. ते आव्हानात्मक ठरेल असे अधिकारी म्हणाला.

बारवी धरण जंगल, मलंगगड जंगल परिसरातून भक्ष्याचा शोध घेत कल्याण पूर्वेत चिंचपाडा भागात शिरल्याचा अंदाज अधिकारी व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *