सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप

सरकार माझ्या जीवाशी खेळत असल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सूडबुद्धीने कारवाई करत सुरक्षा काढली जात असून, सत्ताधारी नेत्यांना दिली जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी सुरक्षा काढण्यास सांगणारी अशी कोणती कमिटी आहे? अशी विचारणाही केली.

तुमच्या घराची अज्ञातांकडून रेकी केली जात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की “मला पोलीस, गुप्तचर यंत्रणांकडूनही यासंबंधी कळलं आहे. गेल्या २५ ते ३० वर्षं, मुंबईच्या दंगलीपासून सुरक्षाव्यवस्था होती. पण या सरकारने सर्व सुरक्षा काढून घेतली आहे. आम्ही पुन्हा सुरक्षा मागितलेली नाही, आणि मागणारही नाही”.

मी ‘सामना’ कार्यालय, शिवसेना भवनात बसलेलो असताना तसंच जेलमध्ये जाताना किंवा घरी येताना याच कारणामुळे पोलिसांची सुरक्षा दिली जात होती. काहीतरी होऊ शकतं याची माहिती असतानाही सरकारने सुरक्षा काढली आहे. याचा अर्थ सरकार माझ्या जीवाशी खेळत आहे. पण काही झालं तरी मी सरकारकडे सुरक्षा मागणार नाही,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की “कोणत्या नियमाने आणि भूमिकेतून ही सुरक्षा काढण्यात आली? अशी कोणती कमिटी आहे ज्यांनी एका क्षणात सर्वांची सुरक्षा काढली आणि सत्ताधारी लोकांना दिली. यासंबंधी जनतेच्या मनात काही शंका आणि प्रश्न आहेत. आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर हे सरकार जबाबदार असेल. आमच्यावर हल्ले व्हावेत, दवाबाखाली राहावं यासाठी सूडबुद्धीने ही कारवाई करण्यात आली आहे. पण तसं काही होणार नाही”.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *