बदलापूरः जिल्ह्यात १०३ आदर्श शाळा, तर १४ स्मार्ट आरोग्य केंद्र

ठाणे जिल्ह्यात लवकरच जिल्हा परिषदेच्या १०३ शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसीत केले जाणार आहे.तर जिल्ह्यातील १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्रांच्या धर्तीवर विकसीत केले जाणार आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आरोग्य विषयक समस्यांवर बोलताना जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली. यासाठी तरतूद असलेल्या निधीचा योग्य विनियोग करण्यासाठी पाऊल उचलण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. मलंगगड प्राथमिक आरोग्य केंद्र अपुरे पडत असल्याने येथे ग्रामीण रूग्णालय उभारण्याची प्रक्रियाही वेगाने करण्याचे आदेश यावेळी देसाई यांनी दिले.

राज्याच्या राजधानीपासून जवळ असूनही ठाणे जिल्ह्यात आणि विशेषतः ठाणे शहर सोडल्यास इतर शहर तसेच ग्रामीण भागात आरोग्य सुविधांची वाणवा आहे. ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेला बळकटी देण्याची गरज आहे. मात्र त्यावर शासकीय यंत्रणांकडून वेगाने प्रक्रिया होत नसल्याची बाब नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उघड झाली. अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड येथे असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र वाढत्या लोकसंख्येमुळे अपुरे पडते आहे. त्यामुळे येथे ग्रामीण रूग्णालय उभारण्याचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. मात्र दहा महिन्यात त्यावर पत्र पाठवण्याखेरीज काहीही होऊ शकले नाही. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावरून जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शल्य चिकित्सक यांची कानउघाडणी केली. दहा महिने काहीही कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आरोग्य विषयक प्रस्तावांचे गांभीर्य लक्षात घ्या. समन्वय साधा आणि येत्या एका महिन्यात हे काम पूर्ण करा असे आदेश यावेळी देसाई यांनी दिले. तसेच मलंगगडाच्या आरोग्य केंद्राची आवश्यक ती दुरूस्ती तातडीने करा अशेही आदेश त्यांनी दिले. जिल्ह्यातल्या आरोग्य समस्यांवर तोडगा काढण्यासाठी येत्या काही दिवसात राज्याचे आरोग्यमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करण्याचेही आश्वासन त्यांनी उपस्थित आमदारांना दिले.

यावेळी बोलताना साताऱ्याच्या धर्तीवर ठाणे जिल्ह्यातही आदर्श शाळा आणि स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र ही संकल्पना राबवण्याची घोषणा त्यांनी केली. जिल्हा परिषदेच्या १०३ शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर सुरूवातीला १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना स्मार्ट आरोग्य केंद्र म्हणून विकसीत केले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यासाठी उपलब्ध असलेल्या निधीचा योग्य विनीयोग करण्याचे आदेश त्यांनी संबंधितांना दिले.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर तोडगा

जिल्ह्यातील शासकीय रूग्णालयांमध्ये कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी कमी असल्याची तक्रार अनेक लोकप्रतिनिधींनी केली. काही ठिकाणी अधिकचे कर्मचारी आहेत. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी अंतर्गत बदल्या करून संतुलन साधा असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *