एक लाखाचे झाले चारशे रुपये; सार्वजनिक ठिकाणी अन्न फेकल्याच्या दंडाची रक्कम केली कमी

एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेतर्फे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांविरुद्ध हरित लवाद कायद्याअंतर्गंत १ लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे. या तरतुदीचा आधार घेत महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवारी नरहरीनगरातील संदीप फुलझेले यांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र, त्यानंतर काही तासांतच दंडाची रक्कम एकदम चारशे रुपयांवर करण्यात आली. या प्रकाराने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी महापालिकेने रामनगरातील एका सभागृहाला रस्त्यावर अन्न फेकण्यासाठी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे, नागरिकांनी उरलेले अन्न रस्त्यावर न टाकता त्यापासून कम्पोस्ट तयार करावे किंवा कचरा कंपन्यांच्या स्वाधीन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाकडून सध्या शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शहरात ब्लॅकस्पॉट तयार होऊ नयेत, यासाठी मनपातर्फे काळजी घेण्यात येत आहे. त्याचअंतर्गत मानेवाडा-बेसा रोड परिसरातील नरहरीनगर येथील फुलझेले यांच्यावर सार्वजनिक जागी अन्न फेकल्याप्रकरणी एक लाख रुपये दंड ठोठावला होता. त्यासाठी राष्ट्रीय हरित लवादच्या निर्णयाचा दाखल देण्यात आला होता. परंतु, ही चूक लक्षात येताच पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केल्याचे सांगत दंडाची रक्कम चारशे रुपये करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *