एकमेव कमावत्या मुलाच्या मृत्यूने कदम कुटुंबावर शोककळा

मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवर बुधवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या पाच जणांमध्ये सुरक्षा रक्षक चेतन कदम यांचाही समावेश आहे. घराची आर्थिक घडी सांभाळणाऱ्या चेतन यांच्या निधनाने कदम कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवर होणारे अपघात किंवा वाहनचालकांना कोणतीही अडचण आल्यास सुरक्षा रक्षकांना किंवा पर्यवेक्षकांना बोलावले जाते. त्याच पर्यवेक्षकांपैकी चेतन कदम एक.

एल्फिन्स्टन येथील स्वराज्य गृहनिर्माण सोसायटीतील रहिवाशी असलेले कदम नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. वडिलांच्या निधनानंतर मोठा मुलगा म्हणून चेतन यांनी आई आणि आपल्या लहान भावाला सांभाळ केला. वांद्रे-वरळी सी लिंकवर झालेल्या अपघातातील जखमींच्या मदतीला धावलेल्या चेतन यांच्यावर काळाने घाला घातला. पाच वर्षांपूर्वी सागरी सेतूवर आत्महत्या करणाऱ्या एका व्यक्तीचे प्राण त्यांनी वाचवले होते. त्यांच्या पश्चात त्यांची आई, भाऊ, पत्नी, साडेतीन वर्षांचा मुलगा असे कुटुंब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *